वडूज : आपल्या विविध मागण्यासाठी देशभरातील ग्रामीण डाक सेवकांनी दि. 18 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात खटाव – माणसह जिल्ह्यातील नऊशे हून अधिक डाक सेवक सहभागी झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात डाक सेवा विस्कळीत झाली आहे.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या संपातील प्रमुख कमलेशचंद्र कमिटीने केलेल्या शिफारसी पूर्णपणे न स्वीकारता त्यात काटछाट करून आदेश काढण्यात आले आहेत. जानेवारी 2016 ते 2018 पासून वेतनाचा फरक देताना फक्त वाढीव भत्ता हिशोबात घेऊन फरक काढण्यात आला त्यामुळे ग्रामीण डाकसेवकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युटी च्या रकमेची शिफारस 5 लाखांची असताना सरकारने अवघी दीड लाख केली आहे. तसेच तीस दिवस पगारी रजेचा विचार केला नाही तसेच पेन्शन फंडासाठी 10 टक्के कर्मचारी 10 टक्के सरकारी हिस्सा द्यावा ही मागणी सुद्धा अमान्य करण्यात आली. त्याचबरोबर कालबद्ध प्रमोशन, स्वेच्छानिवृत्ती, बदली या बाबींचाही विचार करण्यात आलेला नाही. अशा पद्धतीने मोदी सरकारने कोणताही अभ्यास न करता निर्णय घेऊन ग्रामीण डाक सेवकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नेहमीचाच कित्ता गिरवला आहे. मोदी सरकारने कमलेशचंद्र समितीच्या शिफारशींच्या बाबतीत घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे अखेर संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे खटाव तालुका संघटक कॉम्रेड करिमभाई शिकलगार यांनी सांगितले. या मागण्यांचा केंद्र सरकारने विचार करून त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतातील तीन लाखांपेक्षा अधिक ग्रामीण डाक सेवकांनी या संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
वडूज पोस्ट ऑफिस समोेर खटाव तालुक्यातील सर्व शाखा डाकघरातील कर्मचार्यांनी निदर्शने केली. यामध्ये तालुका संघटक करिमभाई शिकलगार, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती मीना बडवे, श्री बी.जे. खुस्पे, मोहन शिंदे, नंदकुमार धर्माधिकारी, शंकरराव फडतरे, जे.जी.बाबर, रमिजा आतार , सचिन दौंड आदी बहुसंख्य ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.
वडूज येथे ग्रामीण डाक सेवकांच्या संपास प्रतिसाद
RELATED ARTICLES