फलटण: कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीकडे पायी येत असलेल्या संत नामदेेव महाराज पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. नामदास महाराज यांच्या पार्थिवावर आळंदीत इंद्रायणी घाटावर सायंकाळी 6.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
परंपरेप्रमाणे संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरहुन आळंदीकडे कार्तिकी वारीसाठी दरवर्षी येत असतो. त्यानुसार यावर्षीचा सोहळा सोमवारचा सासवड मुक्काम उरकुन दिवे घाटातून पुण्याकडे येत असताना घाटात आज (मंगळवार) सकाळी 9.30 च्या सुमारास जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याने तो थेट या सोहळ्यात घुसला त्यामध्ये संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी (वय24 रा.येवुलखेड ता.शेगाव,जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला.
या अपघातात विष्णू सोपान हुळवळ (वय35), शुभम नंदकिशोर आवारे (वय23), गजानन संतोष मानकर (वय 20), वैभव लक्ष्मण बराटे (वय 28), अभय अमृत मोकमपुल्ले (वय 19), किर्तीमान प्रकाश गिरजे (वय23), आकाश माणिकराव भाटे (वय30), ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम (वय 40), गरोबा जागडे (वय 35), विनोद लहाने (वय 30), नामदेव सागर (वय 34), सोपान महासाळकर (वय25), दिपक अशोक लासुरे (वय19), भारत आरुडे (वय 21), भूषण गिरी (वय 22), निलेश माने (वय34), दत्ता चौरे (वय 35) हे जखमी झाले असून सर्व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नोबेल हॉस्पिटल, हडपसर पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच वारकरी सांप्रदायातील अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. आषाढी वारीला पोलीस बंदोबस्त असतो मात्र अन्य तिर्थक्षेत्री परंपरेने जाणार्या पायी पालखी सोहळ्यांना पोलीस बंदोबस्त नसतो या घटनेनंतर आतातरी शासनाने राज्यातील परंपरागत पालख्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे चोपदार रामभाऊ चोपदार यांनी केली आहे.
कार्तिकी वारीच्या पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराजांचा मृत्यू
RELATED ARTICLES