वडूज : खटाव तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. चैत्र पौर्णिमा ते अमावस्या अखेर निमसोड जिल्हा परिषद गटातील विविध गावात ग्रामदैवताच्या यात्रा भरत असतात. या यात्रा-जत्रांच्या कालावधीतच आलेले पै. पाहुणे व बाहेरगांवच्या मंडळींच्या सेवेसाठी स्थानिक ग्रामस्थ व महिलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.
गटातील सर्वात मोठे व प्रमुख गांव असणार्या निमसोड गावात श्री सोनारसिध्द व श्री चंद्रसेन या दोन देवाच्या मोठ्या यात्रा भरत असतात. गावासाठी दोन वर्षापूर्वी हिंगणगांव तलावातून नवीन पाणीयोजना मंजूर करुन घेतली आहे. तांत्रिक अडचणी व वीज वितरण कंपनीच्या असहकार्यामुळे या योजनेचे काम रखडले आहे. सद्या गावातील खोलीकरण केलेल्या बारवेच्या माध्यमातून घाडगे आळी, रामोशी गल्ली, मागासवर्गीय वस्ती व सोनारसिध्द मंदीर परिसरातील रहिवाश्यांची तहान भागवली जाते. उर्वरित गावास दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. शितोळेवाडी, शिंगाडेवस्ती, बडेखानमळा, महादेवमळा, पश्चिम घाडगेमळा, मधला मळा या भागास उरमोडी कॅनॉलचा चांगला फायदा मिळत आहे.
पेडगांव येथे दोन महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या ठिकाणी12 हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून चार खेपा करण्यात येत आहेत. मांडवे, तडवळे येथे दहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या प्रत्येकी पाच खेपा आहेत.
खातवळ, एनकूळ, पळसगांव, दातेवाडी, मोराळे, दातेवाडी, धोंडेवाडी, कणसेवाडी, शिंगाडवाडी, पिंपरी येथे बारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दोन खेपा होत आहेत. डांभेवाडी व सातेवाडी येथे 12 हजार क्षमतेची एक खेप टाकली जाते.
वाकेश्वर, हिंगणे, डाळमोडी, बोंबाळे, गणेशवाडी, येरळवाडी, मरडवाक, मानेवाडी, तुपेवाडी या गावांमध्ये अद्याप पाण्याचे स्थानिक स्त्रोत चांगले आहे. शिवाय या गावांना काही अंशी उरमोडी कॅनॉलचाही फायदा होत आहे.
सामाजिक बांधिलकीची भावना मात्र त्यातही राजकीय आडकाठी
निमसोड गटातील काही गावात दहिवडी येथील शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून टँकरच्या सहाय्याने मोफत पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र हे काम विशिष्ट राजकीय गटाशी संबंधीत असल्याने काही गावात पाण्याचे वाटप करण्यास ग्रामपंचायतीचे कर्मचारी पुढे येत नसल्याची तक्रार समोर आली आहे.
निमसोड गटात ऐन यात्रांच्या कालावधीत पाण्यासाठी भटकंती
RELATED ARTICLES