सातारा : ( अजित जगताप ) कोरोना विषाणू जगभर पसरला. परदेशातून आलेल्या लोकांमुळे त्याचा भारतात शिरकाव झाला आहे. राज्यातही त्याची लक्षणे दिसतात.तरीही सातारा जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व पोलीस, आरोग्य विभागाने हा विषाणू थोपविण्याचे कार्य अहोरात्र सुरू ठेवले आहे. त्यांना बळ देण्यासाठी स्वखुशीने घरापासून विलगीकरण करून २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने किट देणारे स्वेच्छानिवृत्ती पोलीस अधिकारी व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आज आपल्यापरीने साथ देत आहेत.
कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत अनेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस विभाग, प्रसार माध्यमे, पुरवठा विभाग, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. त्यामध्ये आपलाही सहभाग असावा या भावनेतून उधोजक व स्वेच्छा निवृत्ती घेतलेले पोलीस अधिकारी जाधव हे गेली सव्वा महिन्यापासून घरातून बाहेर पडले आहेत. सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील डाॅक्टर नर्स यांना स्वखर्चाने पी पी इ(Personal Protection Equepement) किट पोहच करण्याचे काम त्यांनी केले आहे. यासाठी खास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून ते सातारा जिल्ह्यातील सरकारी व खाजगी दवाखान्यात भ्रमंती करीत आहेत. शिवसैनिक कसा असावा? याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या पूर्वी अतिवृष्टी संकटात सर्वाना मदत करून उपेक्षित कातकरी समाज्यात राहून त्यांच्या कुटुंबातीने दिवाळी साजरी केली होती.
अतिट ता. खंडाळा व पुण्यातील पाषाण येथे त्यांचे आलिशान निवासस्थान आहे.घरात बसून ते मदत करू शकत होते. मात्र, समाजात जाऊन त्यांना मदतच नव्हे तर धीर देण्याचे कार्य करण्यात मनस्वी समाधान मिळते असे त्यांनी सांगितले. त्यांना या कार्यात उस्फुर्त पणे सर्वांचे सहकार्य लाभले आहे.
शिरवळ येथील मुक्कामी दररोज सकाळी लवकर उठुन स्वत: स्वयंपाक करीत आहेत. गाडीत आवश्यक साहित्य भरून गाडी स्वतः चालवित सातारा जिल्ह्यात किटचे वाटप करत आहेत. नाशिक येथे स्वत: जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या दर्जाचे ३०० किटस आणले होते.यासाठी त्यांनी एकट्याने रात्रीचा प्रवास केला होता.
खंडाळा,महाबळेश्वर,वाई,पाचगणी,सातारा,कोरेगांव ,कराड मेढा , म्हसवड,मल्हारपेठ पाटण यासारख्या शासकिय रुग्णालयात जाउन या किटचे वाटप केले आहे. या मदती बद्दल सरकारी व खाजगी डाॅक्टरांनी सातारा जिल्हा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री जाधव यांचे आभार मानले आहेत.निवडणुकीत मते मागण्यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्तीत फिरलो होतो.. त्या मतदारांना दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. ती पूर्ण केली जात आहे.
घरातील लोकांचा विश्वास व सामाजिक कार्यात पाठींबा मिळत असल्याने हे कार्य शक्य झाले आहे. आयुष्यात नशिबाने भरपूर कमविले आहे. त्यातील काही हिस्सा हा गरीब व गरजवंत लोकांचा वाटा आहे. तो त्यांना देण्याचे कार्य करीत आहेत.या पलीकडे काही नाही. लोकांनी कामातून आपल्याला ओळखावे अशी त्यांची अपेक्षा आहे.