सातारा दि. 15 (जि.मा.का.) : सातारा जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो हे आता वॉटर कप स्पर्धेत टाकेवाडी ता. माण हे प्रथम तर भांडवली या गावाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवून या गावांनी सिद्ध केले असल्याचे सांगून कमी निधीमध्ये अधिक सिंचनाचे काम जिल्ह्यात झाल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज सांगितले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष माधवी कदम, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय शिवतारे यावेळी शुभेच्छा देताना पुढे म्हणाले, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र, सातारा या विभागाकडून प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत 41 खासगी मान्यताप्राप्त सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून 4 हजार 362 उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून 921 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील 2 हजार 480 उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला असून 82 उमेदवारांनी स्वयंरोजगार सुरु केला आहे.
या वर्षी झालेल्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषीक टाकेवाडी (आंधळी) ता.माण या गावाने पटकविला आहे. तर भांडवली ता. माण या गावाने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकविला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही गोष्ट भुषणावह आहे. त्याबद्दल पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी दोन्ही गावाचे अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यामध्ये जलयुक्तर शिवार अभियान अतिशय यशस्वीपणे राबविले असून सन 2015 – 16 , 2016 – 17 , 2017 – 18 व सन 2018 – 19 या वर्षात एकूण 726 गावांची निवड शासन निर्णय व निकष याचे अधिन राहून करण्यात आली. या अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने क्षेत्र उपचाराची कामे घेण्यात आली. कामामुळे भुजल पाणी पातळीत मध्येआ 0.51 ते 1.38 मीटर ने वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतील कामांमुळे टँकरच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जिल्हायात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले आहेत. यामध्ये् ओढा जोड प्रकल्प, पाझर तलाव जोड प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियान गावात तसेच वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांना 100 टक्के सूक्ष्म् सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यातआला असल्याचेही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील डिजीटल सातबाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. यामध्ये माण तालुक्याचे काम 94.34 टक्के, खटाव 96.43, सातारा 97.66, पाटण 100, फलटण 100, वाई 99.15,जावली 100, कोरेगाव 100, कराड 100,खंडाळा 97.1 व महाबळेश्वर 100 टक्के सरासरी जिल्ह्याचे सातबारा संगणीकरणाचे काम 98.89 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये 45 वाढीव तलाठी साझांचे व 7 वाढीव महसूल मंडळाच्या निर्मितीसाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच आणखी 32 वाढीव तलाठी साझे व 5 वाढीव महसूल मंडळांचे तालुकानिहाय वाटप करुन त्यांची निर्मिती करण्याची कार्यवाही सुरु आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत 31 मार्च 2018 अखेर 573.68 लाख रुपांचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 6 लाख 41 हजार 308 इतके बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 1 लाख 29 हजार 87, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना 2 लाख 83 हजार 790 योजनेंतर्गत बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत एकूण 62 हजार 356 गॅस जोडण्या दिलेल्या आहेत.
प्रधानमंत्री अवास योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या शासकीय मालकीच्या जागा उपलब्ध होण्यासाठी एकूण 8 प्रस्ताव आहेत. कोरेगाव तालुक्यातील 11, फलटण तालुक्यातील 87, वाई 6, कराड 19 असे एकूण 123 लाभार्थी संख्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकारी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 93 हजार 782 शेतकऱ्यांना 435 कोटी इतकी रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे.
शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधी 23 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागातून 29 लाख 73 हजार रोपे लावगड करण्यात आली आहेत, म्हणजे ६ लाख २९ हजार एवढे अधिक आहे.
सातारा येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मालकीची सातारा येथील कृष्णा प्रकल्पांतर्गतची 25 एकर जमिनी देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे सातारकरांना एक वैद्यकीय महाविद्यालय त्याबरोबर दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णत: शासनाचा असून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होणार आहे.
पाचगणी हे देशाच्या पश्चिम विभागातले कचरामुक्त सुंदर शहर म्हणून निवडले त्याबद्दल प्रशासनाचे व ग्रामस्थांचे पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी अभिनंदन केले. सातारा जिल्हा हा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 14 हुतात्मा स्मारकांची स्थापना करण्यात आलेली आहे. या हुतात्मा स्मारकांच्या बांधकामास 34 ते 35 वर्षांचा कालावधी लोटलेला असून त्यांच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. या निधीतून सातारा जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नुतनीकरणाचे कामकाज पूर्ण करण्यात आलेले असून या हुतात्मा स्मारकांचे लोकार्पण आज 15 ऑगस्ट रोजी करणारा राज्यातील सातारा जिल्हा पहिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र पुरस्कृत योजनांमधील लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यासाठी केंद्र शासनाकडून पीएफएमएस हे सॉफ्टवेअर तयार केलेले असून यापुढे सर्व लाभार्थ्यांना पेन्शन या प्रणालीमधून करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व लाभार्थी या प्रणालीसोबत जोडण्यात आलेले असून सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना पीएफएमएस प्रणालीमधून पेन्शन वाटप करण्यामध्ये राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 26 प्रकल्प आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7 प्रकल्पाचा समावेश आहे. यामध्ये धोम बलकवडी, मोरणा गुरेघर, तारळी, कुडाळी, वांग मराठवाडी, उरमोडी, जिहे कठापूर चा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात कमी निधीमध्ये जास्त सिंचनाचे काम झाले आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहनही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शेवटी केले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.