सातारा : दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत असून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यवर होत आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. निरामय आरोग्यासाठी परिसर स्वच्छताही महत्वाची आहे. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होवू नये, यासाठी काळजी घेणे केव्हाही चांगले, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. बामणोली येथे कर्तव्य सोशल ग्रप, कुसुंबु जिल्हा परिषद गट आणि राष्ट्रवदी सेवादलाच्या संयुक्तविद्यमाने आयोजित आरोग्य शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. अर्चना रांजणे, राम पवार, सरपंच राजेंद्र सपकाळ, कर्तव्य ग्रुपचे विलास कासार, दिलावर शेख, चंदन घोडके, संतोष मालुसरे, नामदेव धनावडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात शेकडो रुग्णांची मोतिबिंदु तपासणीसह कॅन्सर तपासणी करण्यात आली. 620 रुग्णांची मोफत नेत्रतपासणी व औषधोपचार करण्यात आले. यापैकी 30 रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले तर, 75 रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या की, निरामय आरोग्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची आहे. त्यामुळे बामणोली परिसरातील मित्र मंडळे, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेवून हा निसर्गरम्य परिसर कचरामुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. वाढते प्रदुषण, कचरा या समस्यांमुळे रोगराई पसरत असते. अनेक आजार होत असतात. आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा अजारा पासून दूर राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यास आपणही निरोगी राहू. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
उपचारापेक्षा आजार होवू नये याची काळजी घेणे योग्य : वेदांतिकाराजे
RELATED ARTICLES