कोरेगाव: भाडळे खोर्यासह परिसराला नंदनवन करणार्या वांगणा उपसा जलसिंचन योजनेत करण्यात आलेल्या सकारात्मक बदलामुळे ऐन टंचाई काळात पाण्याची उपलब्धता झालेली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद पहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
वसना वांगणा उपसा जलसिंचन योजनेचा आढावा आ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांच्यासह उच्चपदस्थ अभियंते, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, टंचाई काळात दर पंधरा दिवसांनी आपण आढावा बैठक घेऊन ग्रामस्थांशी विचारविनीमय करत आहोत, टंचाईची दाहकता कमी करण्यासाठी शेतकर्यांना अपेक्षित अशा ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व बसवले जात असून, ओढे-नाल्याद्वारे पाणी दिले जात आहे. जांब खुर्द गावासाठी स्वतंत्र व्हॉल्व बसवल्याने आता गावचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे. परिसरातील तलावांमध्ये या योजनेद्वारे पाणी घेतले जाणार असून, शेतकर्यांनी या योजनेतील बदलांना सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. विजय घोगरे यांनी सध्याच्या आवर्तन काळात झालेले बदल शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिले. शेतकर्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्यास, आणखी पाणी उपलब्ध करु दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी अडीअडचणी मांडल्या, जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी त्यास समर्पक उत्तरे दिली.
वसना वांगणा योजनेद्वारे पाण्याची उपलब्धता, शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद : आ. शिंदे
RELATED ARTICLES