पाटण:-कारखान्याच्या विश्रामगृहाच्या खिडकीतून दिसणाऱ्या मरळी,सोनवडे बेलवडे येथील शेतकऱ्यांच्या उरावर कोट्यवधी रुपयांचा बोजा ठेवणाऱ्यांना मोरगिरी विभागातील कँनाँलची कामेही पूर्ण करता आली नाहीत. निष्क्रिय आणि अकार्यक्षम नेतृत्वाने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गावागावांत भांडणे लावण्याचाच उद्योग करुन धरणांची कामे बंद पाडून जनतेवर सूड उगवण्याचेच काम केले आहे.कारखान्याचे धुरांडे दिसणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणाऱ्यांंना बालेकिल्ला म्हणवून घेणाऱ्या गावांना न्याय देता येत नाही ते मतदारसंघाचे काय कल्याण करणार ? असा खडा सवाल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केला.
येथील ‘ शिक्का मेंन्शन ‘ या त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, वाड्यापासून हाकेच्या अंतरावरील गावांमध्ये आज शेकडो एकर उभा राहिलेला ऊस बिनपाण्याचा आणि बिनघामाचा नाही. मरळी,सोनवडे, बेलवडे येथील शेतकऱ्यांच्या उरावर कोट्यवधी रुपयांचा बोजा ठेवून त्यांना कर्जबाजारी करण्यात आले. याउलट धरणांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्यावर मणदुरे-केरा विभागात आज शेकडो एकर क्षेत्रावर ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर एका रुपयाचेही कर्ज नाही आणि हा ऊसही तुमच्या कारखान्याला नेता येत नाही. हा तुमच्या आणि आमच्या कामातील फरक आहे.आम्ही जेवढी कामे मार्गस्थ लावली ती बंद करण्याचे पाप करणाऱ्यांंनी पूर्वीच्या योजनांची नावे बदलून हे काम मी केले असा नुसताच गाजावाजा केला. यापूर्वीच तीस फुटांपर्यंत विहिरीचे काम झाले असताना आणि आता काम सुरू असतानाही स्वतःच्या हट्टासाठी शासकीय यंत्रणेला भूमीपूजन करायला लावण्याचे काय कारण ? या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजनेचे काम प्रगतीपथावर असतानाही दमदाट्या करून भूमीपूजन करण्याची ही कुठली हौस? गेल्या साडेचार वर्षात स्वतःच्या हट्टासाठी मणदुरे विभागातील धरणांची कामे बंद पाडण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले.
धरणांपासून काही मीटर अंतरावर असलेल्या गावांना टँकरने पाणी घ्यावे लागते हे तुमच्यासारख्या अकार्यक्षम आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींचे कर्तृत्व आहे. धरणांची कामे बंद पाडून जनतेवर सूड उगवण्याचे काम तुम्ही करत आहात.गेली साडेचार वर्षे जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असून पाण्यासाठी भांडणे लावण्याचाच तुमचा उद्योग सुरु आहे.तुम्ही जनतेला पाणी देऊ शकत नाही हे तुमच्या निष्क्रियतेचेच उदाहरण आहे. तुम्ही जरी पाणी दिले नाही तरी आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून गावांना टँकरने पाणी पुरवण्यासाठी समर्थ आहोत. कारखान्याचा अग्निशामक सडून पडला असला तरी आमच्या संस्थांचा अग्निशामक आजही उत्तम स्थितीत असून त्याचा वापर जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच केला जात आहे.
स्वतःच्या हौसेखातर तीनतीनवेळा मुख्यमंत्र्यांना आणले. गेल्या साडेचार वर्षात ज्या योजना तुमच्याकडून होऊ शकल्या नाहीत त्या योजना निवडणूक जवळ आलेली पाहून मीच मंजूर केल्याची नाटके करत आहात तसेच ई भूमीपूजन व ई उदघाटने करून लोकांची फसवणूक करत आहात. पूर्वीच मंजूर झालेल्या योजना आपणच केल्या असे भासवून करत असलेली फसवणूक आता थांबवा. सुरुल गावाला तुमच्या निष्क्रियतेमुळेच पाणी कमी पडत आहे हे तिथल्या लोकांनाही चांगलेच माहित आहे. तीनचार लाखांची भूमीपूजने म्हणजे विकास नव्हे. ही कामे कोणतेही शासन आले तरी होणारच आहेत.मंजूर कामावर किती रक्कम खर्ची पडते याचा हिशोब काढला तर पन्नास टक्के रक्कमसुद्धा खर्ची पडत नाही मग उरलेली रक्कम जाते कुठे याचाही शोध जनतेने घेतला असल्याचे असल्याचे सांगितले.
शासकीय यंत्रणेमध्ये योजनांच्या कामाचे एकट्या आमदारांना अधिकार असतात असे नाही. खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती,पंचायत समितीचे सदस्य आपापल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करून निधी मंजूर करून आणतात व त्यांनाही अधिकार असतात. त्याचे श्रेय घेण्यासाठी कार्यक्रम घेऊन,ढोल वाजवून, बातम्या छापल्या म्हणजे तुम्हीच कामे मंजूर केली असे होत नाही हे जनतेला चांगलेच माहित आहे. ग्रामस्थ आपापल्या परीने पाणी उपलब्ध करीत असतात आणि करत राहतील तुम्ही त्याची काळजी करू नये. शिवसेनेत राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांचे आदेश ऐका.शिवसेना फडणवीस यांच्या विरोधात, फडणवीस सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तुटून पडतात आणि तुम्ही मात्र त्यांचे गोडवे गाता हे तुम्ही आजच करता असे नाही यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढेही असाच लाळघोटेपणा करत होता हे जनतेने पाहिलेले आहे असे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.