रहिमतपूर : मराठी भाषेतील ध्वनिंचे, चालींचे, घाटांचे सौंदर्य किती समृद्धपणे या कवींनी वापरली आहे. आज जे साहित्यिक लिहितात त्यामागे मराठीची अशी समृद्ध वांडमय परंपरा आहे हे विसरून चालणार नाही. गिरीश यांच्या कवितेमध्ये कवितेविषयीचा जिव्हाळा, शब्दांचा जिव्हाळा, माध्यमांविषयी चा जिव्हाळा, त्या काळातील अनेकांनी उचलून धरला. त्यामुळे ही परंपरा समृद्ध होण्यास मदत झाली असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांनी काढले.
रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथे निसर्गकवी गिरीश शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष सांगता समारंभानिमित्त साहित्यिक मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कवी गिरीश यांचे नातू प्राध्यापक अरुण कानेटकर त्यांच्या भगिनी मृणालिनी , तरंगिनी याळगी, जयश्री वैद्य, विनय याळगी, गीतांजली खिरे, प्रा. सुरेश शिंगटे, चौंडेश्वरी संस्थेचे संस्थापक सचिव अरुण माने, उपाध्यक्ष शिवाजीराव माने, सचिव सौ. स्मिता पवार, कोषाध्यक्ष किरण भोसले, प्रा. श्रीकांत बोधे, प्रा. दशरथ जाधव, प्रा. युवराज खरात, प्रा. प्रकाश बोधे यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. ढेरे म्हणाल्या की, कवी गिरीश यांनी गायनातून मराठी कविता घरात पोहोचविली.कवी गिरीश यांना लहानपणापासून कवितांची आवड होती. त्यांना शब्दांविषयी व कवितांविषयी जिव्हाळा होता. त्यांनी आपल्या चालींच्या बरोबर त्याच्यातील गोडव्या बरोबरच मराठी कविता आपल्या काव्य गायनातून घराघरात पोहोचवली.
त्या काळात शिक्षित स्त्रिया फार कमी होत्या पण रविकिरण मंडळाच्या माध्यमातून दर रविवारी सर्व कवी एकत्र येऊन एकमेकांच्या कविता ऐकायच्या असा सुंदर काळ त्या लोकांनी अनुभवला. यामुळे एकमेकांच्या कवितांना दाद मिळवून कवींच्या मध्ये एक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले. सातवीत शिकत असताना कवी गिरीश यांच्या कवितेची ओळख झाली कवितेची आवड असणारी मी ती सादर केली आणि मला पहिले बक्षीस मिळाल्याचे सांगितले.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, कवी गिरीश यांची कविता या मातीमध्ये फुलली कवी गिरीश म्हणजे कवितेचे बहरलेलेे झाड, प्रतिभेचे उत्तुंग शिखर होते. शंभर वर्षापूर्वी या कवीने रहिमतपूर चे नाव आपल्या कवितेच्या माध्यमातून अजरामर करून ठेवले आहे. त्यांच्या गायन कलेने मराठी कविता समाजापर्यंत पोहोचवली शिक्षणाच्या कक्षेत नसणार्या वर्गाचे भरणपोषण करण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले आहे. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन काव्य गायनाचे कार्यक्रम केले आणि कवितेला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून दिली, तीच परंपरा पुढे विविध कवींनी चालवली. पण मूळचा झरा रहिमतपूर हाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
यावेळी सौ. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
दरम्यान सकाळच्या सत्रात नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे म्हणाले की, तरुण पिढी हीच देशाची संपत्ती आहे. त्यांच्या वर पुस्तकांच्या माध्यमातूनच संस्कार होतील. यासाठी मोबाईलच्या ऐवजी पुस्तके हातात दिली पाहिजेत, मोठ्यांनी पुस्तके वाचली तरच मुलं पुस्तकं हातात घेतील. या पुस्तकामुळेच त्यांचा भविष्यकाळ उज्वल होईल.
प्रारंभी रहिमतपूर नगरीत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सौ.स्मिता पवार यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सईशा नाईक, कु. सृष्टी गायकवाड, कु. सई भोसले, सौ.यास्मिन बागवान, सौ. अर्चना जाधव यांनी केले. तर आभार केशवराव माने यांनी मानले. कार्यक्रमास शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, विविध क्षेत्रातील संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
निसर्गकवी गिरीश यांच्या कवितेमध्ये कविते विषयीचा जिव्हाळा होता : कवियत्री डॉ.ढेरे
RELATED ARTICLES