सातारा : राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकातील एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी राज्य शासनाने 100 शाळा दिल्या आहेत. आणखीन राज्यात 100 शाळा देण्याचा शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त शिरवळ ता. खंडाळा येथे 100 मुलींचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे त्याचे भूमीपुजन आज श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, जात पडताळणी समितीचे उपायुक्त रविंद्र कदम, पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, शिरवळचे उपसरपंच सुनिल देशमुख, निखील झगडे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात 50 मुलींचे वसतीगृह बांधण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यासाठी शिरवळ व सातारा येथे मुलींचे वसतिगृह होत आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून 100 मुलींना निवासाची, जेवणाची व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे वसतिगृह शिरवळ पासून थोडे दूर आहे तसेच रस्ताही नाही रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढकार घ्यावा, असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले तर आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी मानले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्धातील एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही : ना. राजकुमार बडोले
RELATED ARTICLES