Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीलोकशाही जगवायची असेल तर पत्रकाराची लेखणी बेईमान होता कामा नये: डॉ. सबनीस

लोकशाही जगवायची असेल तर पत्रकाराची लेखणी बेईमान होता कामा नये: डॉ. सबनीस

फलटण : लोकशाही जगवायची असेल, ती निर्धोक ठेवायची असेल तर पत्रकाराची लेखणी बेईमान होता कामा नये. नागरिकांचा विवेक डळमळीत होता कामा नये. याच परंपरेतील निष्ठावंत पत्रकार व समाजनिष्ठ कार्यकर्ते असलेले रविंद्र बेडकिहाळ यांनी राज्यातील पत्रकारांच्या तसेच विशेषत: लघु वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्याचा लाभ राज्यातील सर्वच वृत्तपत्रसृष्टीला झाला आहे. त्यांचे हे कार्य व कर्तृत्त्व जातीधर्माच्या भेदापलिकडचे आहे. संघटनांच्या माध्यमातून पत्रकारांच्या कल्याणाचे कार्य करण्याची यशस्वी नांदी बेडकिहाळ यांनी केली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ यांचा अमृत महोत्सवी सत्कार सभारंभ महाराजा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ.सबनीस बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व प्र.कुलगुरु आ.डॉ.विश्‍वजीत कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलींद जोशी, सत्कार समितीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, उपाध्यक्ष श्रीमंत बंटीराजे खर्डेकर, सचिन सूर्यवंशी – बेडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार म्हणून भूमिका बजावणारे, शिक्षण क्षेत्रात काम करणारे, जांभेकरांना विसरलेल्या महाराष्ट्राला त्यांची पुन्हा आठवण सातत्याने करुन देणारे बेडकिहाळ यांनी जांभेकरांप्रती डोळस श्रद्धा ठेवून पोंभुर्ले येेथे स्मारक उभारले. बाळशास्त्रींच्या नावे माध्यमिक विद्यालय सुरु करुन बाळशास्त्री आणि शिक्षण क्षेत्र याचा अनुबंध जपला. पत्रकारिता, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपले श्रद्धास्थान निश्‍चित केले ते म्हणजे दर्पणफकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व डॉ.पतंगराव कदम. या दोघांच्याही प्रतिमेला अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करणे हे औचित्यपूर्ण वाटले. अशी कृतज्ञता सर्वांनीच व्यक्त केली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ.सबनीस यांनी व्यक्त केली.
खा.कुमार केतकर म्हणाले, पत्रकारिता आणि राजकारण यांना एकमेकापासून वेगळे करता येत नाही. पत्रकारितेला किमान मूल्ये पाळावी लागतात. पत्रकारिता करताना दर्पणफची उद्दिष्टे जपली पाहिजेत. मागच्या सत्तर वर्षात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करुन कृतघ्नपणा दाखवला जात आहे. कृतघ्नतेपक्षा कृतज्ञता महत्त्वाची असून कृतज्ञतेचे मूल्य विशेषत: पत्रकारितेतून जपणे आवश्यक आहे. ते मूल्य पत्रकारितेत रुजवण्याचे काम आजच्या अमृत महोत्सव सत्कार समारंभाच्यानिमित्ताने पत्रकारितेला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे, असे सांगून खा.केतकर यांनी बेडकिहाळ यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, सकारात्मक वृत्ती, माणसं जोडण्याची कला, हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द असे बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले रविंद्र बेडकिहाळ यांचे पत्रकारांचे संघटनात्मक कार्य मोलाचे आहे.
आ.डॉ.विश्‍वजीत कदम म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांविषयी तळमळ या साम्यामुळे डॉ.पतंगराव कदम व रविंद्र बेडकिहाळ या दोघांचे संबंध दृढ झाले. बेडकिहाळ यांनी सामाजिक जीवनाला आणि लिखाणाला सुरुवात केली तेव्हापासून डॉ.पतंगराव कदमांशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. आज जर डॉ.पतंगराव कदम असते तर कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली असतील. मात्र ते जरी आज नसले तरी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणफकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. रविंद्र बेडकिहाळ यांचा अमृतमहोत्सवी सत्कार खा.कुमार केतकर यांच्या हस्ते संपन्न झाला. भारती विद्यापीठ, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघ, महाराजा मल्टीस्टेट, स्वयंसिद्धा संस्था समूह यांसह शहरातील विविध संस्था, मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यावतीनेही बेडकिहाळ यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समितीच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या लोकमित्रफ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न झाले. बेडकिहाळ यांना पुढील कार्यासाठी श्रीराम विद्याभवन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय व सत्कार समितीच्यावतीने डॉ.शिवाजीराव कदम व आ.डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते कृतज्ञता निधी प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक गौरव समितीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे यांनी तर उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. गौरव ग्रंथाचे संपादक प्रा.विक्रम आपटे, समिती सदस्य प्रा.रविंद्र कोकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रविंद्र येवले यांनी मानपत्राचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरश्री डोंगरे व ताराचंद्र आवळे यांनी केले. आभार सुभाष देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे प्रशासकीय संचालक डॉ.उत्तमराव भोईटे, सहकार्यवाह डॉ.एम.एस.सगरे, राजाभाऊ लिमये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश बापू पाटील, बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष कृष्णा शेवडीकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, स्वयंसिद्धा संस्था समुहाच्या प्रमुख अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, महाराष्ट्र राज्य कंझ्युमर्स मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव घोणशीकर पाटील, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सुभाष धुमे, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, विलास वरे, प्राचार्य श्रीधर साळुंखे, सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र भारती, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांच्यासह राज्यातील विविध भागातून पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर, फलटणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular