कराड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब, भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली अशा झाशीची राणी लक्ष्मीबाई, मादाम कामा, प्रितीलता वेदार अशा अनेक स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले आहे आणि आजही जगात अनेक मोठ्या पदावर महिला विराजमान आहेत आणि म्हणूनच इतिहासात महिलांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिण चे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्यजित पतसंस्था व कराड दक्षिण काँग्रेस तर्फे आयोजित महिला मेळाव्यामध्ये केले. यावेळी व्यासपीठावर कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष व मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ नीलम येडगे, वारुंजी गटाचे पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील तसेच कराड व मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेविका उपस्थित होत्या या मेळाव्याला कराड दक्षिण मधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा जागतिक महिला-दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव संमत करण्यात आला आणि तेव्हापासून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. नुकताच 8 मार्च रोजी मलकापूर नगपरिषदेतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज कराड दक्षिणचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात आमदार चव्हाण म्हणाले कि, महिलांना आदर, सन्मान देण्याबाबत महाराष्ट्र नेहमीच देशात आघाडीवर राहिला आहे. स्त्री शिक्षणाची सुविधा महाराष्ट्रात 150 वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. स्त्री चळवळीची बीजे रोवण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. महिलांच्या शक्तीला ओळखण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले आणि त्यांनी स्वातंत्र्य युद्धात त्यांना महत्वाचे स्थान दिले. पुरूषांसोबत महिला सुद्धा ब्रिटिशांविरूद्ध लढल्या. महात्मा गांधींनी महिलांना त्यांची आंतरिक शक्ती, सक्षमता याची ओळख पटवून दिली. महिला कोणतेही आव्हान स्वीकारू शकतात हे सिद्ध झाले.
महिलांना समाजात आणि राजकारणात बरोबरीचे व सन्मानाचे स्थान हे तत्व काँग्रेस पक्षाने अगदी स्थापनेपासून पाळले आहे. 1917 मध्ये एनी बेझंट (Aपपळश इशीरपीं) यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषवले. 1925 मध्ये सरोजिनी नायडू पहिल्या भारतीय महिला म्हणून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. काँग्रेसच्या या महिला धोरणामुळेच इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या तसेच मीरा कुमार या पहिल्या महिला लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या.
राजीव गांधी यांनी महिलांना 33% आरक्षण देण्यासंदर्भात महिला धोरण संसदेत मांडले. 1994 मध्ये स्वतंत्र महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. त्यानंतर राज्याने स्थितीचा आढावा घेऊन सन 2001 मध्ये सुधारित महिला धोरण जाहिर केले. 5 फेब्रुवारी 2014 रोजी माझ्या मंत्रिमंडळाने तिसरे महिला धोरण जाहीर केले. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टिकोन रुजवणे आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलवणे, महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी मिळावी यासाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करण्याचा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणारी आधुनिक व स्वबळावर उभी असणारी नवी प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
इतिहासात महिलांचे मोलाचे योगदान ः आ.पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES