वडूज : शिक्षणाच्या विविध शाखांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण व व्यवसाय शिक्षणाची दालने खुली झाली असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार समितीचे प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी सांगितले.
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीदान समारंभात ते म्हणून बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या कमला कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी प्राचार्य सी. आर.गोडसे, आर. एन. घाडगे, सचिव व्ही. आर. गोडसे, संचालक पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली असली तरी विद्यार्थ्यांकडील चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेला नक्कीच चांगल्या संधी आहेत असे सांगून प्राचार्य डॉ. मोरे म्हणाले, 1857 साली ब्रिटीश काळात देशात मुंबई, मद्रास, कलकत्ता ही तीनच विद्यापीठे व देशात 27 महाविद्यालये होती. आज देशात 890 विद्यापीठे व सुमारे 50 हजार महाविद्यालये कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल घडत गेले. शैक्षणिक क्रांतीत धवल पाऊल पडू लागले आहे शिवाय शिक्षण घेण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. शिक्षणाच्या विविध शाखांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण व व्यवसाय शिक्षणाची दालने खुली झाली आहेत. आपणाला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग धवल जीवनासाठी करावा. शैक्षणिक स्पर्धा असली तरी विद्यार्थ्यांनी चांगली गुणवत्ता जोपासल्यास नक्कीच यश मिळू शकते.प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठा अंतर्गत 293 महाविद्यालये कार्यरत आहेत. ज्या त्या ठिकाणच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांत नोकरभरती बंद असली तरी विद्यार्थ्यांनी पदवी व नोकरी यांचा संबंध ठेवू नये. कौशल्यावर आधारीत शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण आणि बारावीनंतर शास्त्रोक्त शिक्षण अशा शाखांतून विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीस चालना दिली आहे.
दादासाहेब गोडसे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांना नेहमीच चांगली शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्याबरोबरच शिस्त व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच संस्थेच्या पूर्व प्राथमिक ते वरिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक कमविला आहे.प्रभारी प्राचार्य व्ही. बी. गुजर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ. एस. एम. गिरे यांनी सूत्रसंचालन केले. . प्राचार्य धनाजी कठरे यांनी आभार मानले. यावेळी अधिक्षक राजेंद्र गोडसे, विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ क्षितीज धुमाळ, प्रा. धनराज आवळे, प्रा. बी. टी. साबळे, प्रा. डॉ. पाटील आदी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण व व्यवसाय शिक्षणाची दालने खुलीः प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे
RELATED ARTICLES