पाटण:- तामकडे (ता. पाटण) येथे बुधवार दि. २० रोजी माळरानावरील जनावरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत तब्बल १० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर २ जनावरे गंभीर असुन ती पूर्णपणे आगीत होरपळली आहेत. या आगीत राजाराम बापू पवार या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा महसूल विभागाचे कर्मचारी करत होते. दरम्यान या आगीत राजाराम पवार यांचे सर्व पशुधन जळाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जळीतग्रस्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
बुधवारी दुपारी १२. ३० वाजता खळ्याचा माळ नावाच्या शिवारात असणाऱ्या राजाराम बापू पवार यांच्या मालकीच्या जनावरांच्या शेडला अचानक आग लागली. घरापासून काही अंतरावर हे शेड असल्याने आग लागलेली कोणाला समजली नाही. मात्र काही वेळानंतर होरपळलेल्या अवस्थेत काही जनावरे गावाच्या दिशेने पळत आल्यावर शेडला आग लागल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यानंतर ग्रामस्थांनी जनावरांच्या दिशेने धाव घेतली व अग्निशामक विभागाला कळविले. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग भडकली.
या आगीत २ गाभण म्हैस, १ रेडकू, २ गाई, १ वासरू, ३ बैल अशा सुमारे १० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर २ जनावरे गंभीर झाली असून पूर्णपणे जळाली आहेत. त्यांच्यावर पशुधन अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरु केले आहेत. मात्र ती हि जास्त काळ जगू शकणार नाहीत असे त्यांनी सांगितले. या आगीत शेतकर्याचे संपूर्ण पशुधन जळून गेल्याने सुमारे ७ ते ८ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु होते.