भुईंज ः प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी करताना नवनवीन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण प्रश्नांना सामोरे जात असताना यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी किसन वीर कारखाना व्यवस्थापनावर दाखविलेला विश्वास हीच आमची शक्ती आहे. वाहतुक कंत्राटदारापासुन कारखान्यातील कामगारांच्या योग्य नियोजनामुळे व सांघिकतेच्या जोरावर हा हंगाम यशस्वी झाला असल्याचे प्रतिपादन, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19 च्या गळित हंगामाची सांगता कारखान्याचे चीफ इंजिनियर आर. बी.जगदाळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उषा जगदाळे या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाणीचे विधीवत पुजन करून झाले. त्यावेळी ते बोलत होते. गजानन बाबर पुढे म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाला सभासद शेतकर्यांचे नेहमीच सहकार्य लाभलेले आहे. मदनदादा भोसले व संचालक मंडळानेही नेहमीच त्यांच्या हिताचा विचार करून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विश्वासावर आणि ऊस तोडणी मजुर, बैलगाडीवान, ट्रक-ट्रॅक्टर वाहन मालक, मशिन मालक, तोडणी कंत्राटदार, कारखान्यातील अधिकारी व कर्मचार्यांच्या सहकार्यामुळेच हा हंगाम यशस्वी झाला. केन हार्वेस्टरमुळे कार्यक्षेत्रातील ऊसाची वेळेत आणि गतीने तोड झाली. भविष्यात ऊस तोडीच्या यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. अशा अडचणींवर मात करण्याचे कसब मदनदादा भोसले यांच्याकडे आहे. त्यांना आम्हा संचालकांची नेहमीच साथ राहीलेली आहे. आपल्या सर्वांचे आशिर्वादही त्यांच्या पाठीशी हवेत, असेही शेवटी गजानन बाबर म्हणाले.
यावेळी चीफ इंजिनियर आर. बी.जगदाळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उषा जगदाळे यांचा सत्कार गजानन बाबर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, प्रॉडक्शन मॅनेजर अशोक साळुंखे, शेतकरी, तोडणी मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
किसन वीर वरील विश्वास हीच आमची शक्ती- गजानन बाबर; किसन वीरच्या हंगामाची सांगता
RELATED ARTICLES

