
परळी : सज्जनगडावर दररोज हजारो भाविक असतात गडावरील दासनवमी महोत्सव होऊन काही दिवस झाले आहेत. मात्र गडावरील कायमस्वरूपी असणारे प्रश्न तसेच कायम आहेत. यात्रा काळात निवेदनाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत फक्त शासकीय कागदी घोडे नाचवणार अशीच परिस्थिती झाली.
सज्जनगडाच्या बसस्थानकातच भाविकांना प्रवाशांसाठी नसून बसस्थानकच अतिक्रमणात गडप झाले आहे तर संभोवतालचा परिसरात अतिक्रमणे झाली आहेत बसस्थानकाच्या चौफेर कचरा साठल्याने कचर्याच्या ढिगार्यांमुळे अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे . गडावरील एक पिण्याच्या पाण्याचे तळे सोडले तर इतर तिन्ही तळ्यांमधील पाण्यांमध्ये हिरवा रंगाचा तवंग आला आहे.
तर पाण्यामध्ये कचरा साठल्याने गडावरील ऐतिहासिक पाण्याची तळी सुशोभीकरण नसल्याने तसेच अस्वच्छ असल्याने भाविकांची घुसमट होत आहे सद्यस्थितीत पांगारे तसेच परळीहून पिण्याचे मुबलक पाणी असल्याने पाण्याचा प्रश्न तरी संपला आहे. गडावरील काही व्यावसायिकांचा कचरा सर्वत्र पसरत असल्याने आंगलाई मंदिर संस्थांच्या बाजूला तसेच पायरी मार्गाच्या बाजूला कचर्याचे ढीग साचले आहेत . आंगलाई मंदिराच्या बाजूला लेव्हर ब्लॉक (तटबंदीचे) काम अजूनही रखडलेले आहे. गडावरील कायमस्वरूपी रहिवाशांना तसेच रामदासी, भाविकांना सज्जनगडावर आल्यावर आध्यात्मिक शांती हवी असेल तर गडावरील स्वच्छतेला अग्रक्रम दिला पाहिजे.

