Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी... काय तो माझा रे गुन्हा ? उदयनराजे भोसले चक्क आरोपीच्या पिंजर्‍यात...

… काय तो माझा रे गुन्हा ? उदयनराजे भोसले चक्क आरोपीच्या पिंजर्‍यात ; सातार्‍यातील ईस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनता अदालत कार्यक्रमात खा. उदयनराजेंनी सहभाग घेतला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे काही काळासाठी आरोपीच्या पिंजर्‍यात बसले होते. मात्र, सर्व आरोपांमधून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने त्यांची सुटका झाली. शेती व पिण्याच्या पाण्यापासून ते थेट काश्मीर प्रश्नापर्यंत. तसेच सातारा जिल्ह्याचा विकास, अच्छे दिनची घोषणा आदिंवर खासदार उदयनराजें भोसलेंनी वकिलांच्या प्रश्नावर बिनधास्त उत्तरे दिली. त्यामुळे सर्वच आरोपांतून उदयनराजेंची निर्दोष मुक्तता करत त्यांना आणखी पाच वर्षे दिल्लीत खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी भावी वकिलांनी जनता अदालत या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या.
सातार्‍यातील ईस्माईल लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनता अदालत कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी सहभाग घेतला. त्यावेळी, उदयनराजेंना आरोपी म्हणून लाकडी पिंजर्‍यात बसविण्यात आले होते. सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी व्यासपीठावर अभिमत न्यायालयाप्रमाणे रचना करण्यात आली होती. व्यासपीठासमोर एका बाजूच्या लाकडी पिंजर्‍यात पक्षकार उदयनराजे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती.
या पिंजर्‍यात बसूनच उदयनराजेंनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. सातारा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास, वैयक्तिक आवडी निवडी, आदर्श व्यक्तिमत्व अशा विविध प्रश्नांची उजळणी ठेवत लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खासदार उदयनराजेंना बोलतं केले.
विविध प्रश्नांवर आपली बाजू थेट मांडताना उदयनराजे म्हणाले, कच्चा माल उपलब्धता, विकसीत पायाभूत सुविधा यांमुळे उद्योगांचा कल आधिपासूनच मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांकडे होता. परंतु, आता तेथील वाढीवर मर्यादा असल्याने हे उद्योग धंदे महामार्गालगतच्या शहरांकडे सरकू लागले आहेत. कास तलाव उंची वाढ, ग्रेड सेपरेटर आदी कामांमुळे सातार्‍यातही विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. त्यासाठीचे काही प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. आचारसंहिता संपल्यावर त्याला गती मिळेल.
जीवनात कोणाला आदर्श मानता या प्रश्नावर ते म्हणाले, मसर्व गुणांचा संचय असलेले एकच व्यक्तिमत्व या जगात आहे, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत.
उदयनराजेंचा बिनधास्तपणा भावी वकिलांनाही भावल्याचे दिसून आले. मात्र, आपल्या उत्तरामुळे महाविद्यालयातील न्यायाधीश महोदयांनीही उदयनराजेंची निर्दोष मुक्तता केली, तसेच भावी खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular