Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीग्रामीण भागात गंजीच्या माध्यमातून एकोपा

ग्रामीण भागात गंजीच्या माध्यमातून एकोपा

वडूज : आजकाल सुगीच्या दिवसात बहुतांशी कामे यांत्रिक पध्दतीने उरकली जात आहेत. एकमात्र कडबा (वैरणीची) गंज लावणे हे काम मानवी हाताशिवाय होत नाही. या गंजी च्या माध्यमातून ग्रामीण भागात एकोपा जोपास्याचे काम होत आहे.
पूर्वीच्याकाळी बैलाच्या सहाय्याने पेरणी होत असे, तर खळे, तिवडा लावून जनावरांच्या माध्यमातून मळणी केली जायची. ज्यांच्याकडे जनावरे नव्हती ती मंडळी मोगरी अथवा बडावण्याच्या सहाय्याने ठोकून कणसामधून ज्वारी काढत होते. अलिकडच्या दहा ते पंधरा वर्षात कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. तीन वर्षापूर्वी हॉलरच्या सहाय्याने मळणी केली जायची. आता तर हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतातच गव्हाची काढणी व मळणी एकाच वेळी होवू लागली आहे.
अश्या परस्थितीत गंज लावणे हा एकच कार्यक्रम एकमेकाच्या सहकार्यातून पार पडत आहे. गंज लावण्यासाठी एक तरबेज माणूस असतो. तर पेंड्या जुळणी व टाकणीसाठी अन्य चार पाच लोक असतात. गंज शेखरणारा अगदी जवळचा असला तर काही मोबदला घेत नाही. अथवा लांबच्या लोकांकडून वैरणीच्या प्रमाणात 200 ते 500 रुपये घेतले जातात. तर इतर लोकांसाठी पूर्वीच्याकाळी इरजीक पध्दत होती. आत्ताच्या काळात रंगीत-संगित पार्टी देण्याची पध्दत आली आहे. वाकेश्‍वर या सुमारे 2 हजार लोकवस्ती असणार्‍या गावात पूर्वीच्या काळी मुगुटराव फडतरे, जगन्नाथ श्रीपती फडतरे, नाना यशवंत राऊत, भानुदास साहेबराव फडतरे हे चांगले गंजाडी म्हणून प्रसिध्द होते. अलिकडच्या काळात नव्या पिढीतील फुलचंद पंढरीनाथ फडतरे, राजाराम नारायण फडतरे या युवकांनी ही कला जोपासली आहे. फुलचंद फडतरे यांना गणेश चव्हाण बेलवडेकर, नारायण पाटोळे, सदाशिव मदने हे सहकार्य करतात.
सहज विद्या प्राप्त झाली.
याबाबत बोलताना फुलचंद फडतरे म्हणाले, गंज लावणे हे काम दिसते तितके सोपे नाही. चांगली गंज लागली तर तेवढ्यापुरते मालक समाधानी असतात. तर चुक झाली तर सारा गांव वर्षभर मापे काढतो. वयाच्या 18 व्या वर्षी आपण गावातील एकजणाची गंज लावत असताना पेंड्या टाकण्यासाठी गेलो होतो. गंज निम्म्यावर आली असताना अचानक गंजाडी गायब झाला. त्या गंज मालकाने राहिलेली गंज पुरी करण्यासाठी जमतयं का बघ ? असे सांगितले.
त्यावर आपण धाडसाने गंजीवर चढलो. तेव्हापासून आजपर्यंत पाठीमागे बघीतले नाही. दरवर्षी 20 ते 25 गंजी लावतो. कोण मोबदला देते तर कोणाचे काम माणूसकीने असेच करावे लागते. देगा उसका भला, नही देगा उसकाभी भला या न्यायाने आपण गंज लावण्याची कला जोपासत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular