सातारा : देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही आदर करत आलो आहे. पण आताचे पंतप्रधान हे जातीयवादी आहेत. भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. पवारांच्या पुतण्याने शरद पवारांची दांडी गुल केली, या मोदींच्या टिकेचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. मोदी साहेब पवार घराणे आजही एकत्र आहे आणि भविष्यातही मरेपर्यंत एकत्रच राहील. याची तुम्ही काळजी करू नका, असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. ते सातार्यात बोलत होते.
राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शिवेंद्रराजे आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनिल माने, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्रीमंत सौ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, शिवाजीराजे भोसले, सारंग पाटील, सत्यजीत पाटणकर, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, अखिल भारतीय माथाडीचे कामगार नेते अविनाश रामीष्टे, धर्मराज जगदाळे, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथे झालेल्या सभेतील टिकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचा आम्ही आदर करत आलो आहे. परंतु आतापर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले, त्यांनी कधीही व्यक्ती आणि घराण्यावर टिका केली नाही. पण आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांवर न बोलता घराण्यावर टिका करीत आहेत. पवारांच्या पुतण्यांनी शरद पवारांची दांडी गुल केली. मोदीसाहेब पवार आजही एकच आहेत आणि उद्या मरेपर्यंत एकत्रच रहातील, मोदीसाहेब पवार घराण्याची तुम्ही चिंता करू नये, असा टोला लगावला.
मसातारा लोकसभा मतदार संघातील जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एवढे कडक ऊन असतानाही तुम्ही सर्वजण इथे आला आहात. आजची गर्दीच सर्वकाही सांगून जात आहे. निकाल काय लागणार, हे सांगायला जोतिषाची गरज नाही. सातारचा निकाल काय लागणार हे, सगळ्या महाराष्ट्रला कळून चुकले आहे. ही निवडणूक जाती-पातीच्या आणि शाहू, फुले यांच्या विचारांच्या विरोधात आहे. लोकांच्या मनात मोदीची लाट राहिलेली नाही. हे आजच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.
मोदी विरोधात सर्वत्र लाट निर्माण झाली आहे. पण माझे एकच सांगणे आहे की, गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा होता कामा नये. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागले पाहिजे. उदयनराजेंना विक्रमी मतांनी निवडून आणून महाराष्ट्र इतिहास घडवायचा आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
आम्ही पवार मरेपर्यंत एकत्रच, मोदींनी आमची चिंता करु नये : अजित पवार
RELATED ARTICLES