कराड : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साता-यात लोटलेला जनसमुदाय पाहता उद्याच्या निवडणूकीत श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे विक्रमी मताधिक्क्य निश्चित आहे. फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता पक्षांची ध्येयधोरणे घराघरांत पोहचवावीत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील दत्त चौकात राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, दलित पँथरचे प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, अॅड. राजाभाऊ पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या धोरणांवर हल्ला चढवताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप आणि संघवाले या देशाला पुन्हा 19 व्या शतकाकडे घेऊन चालले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी तर विकासाचे मुद्दे बाजुला ठेवून वैयक्तिक टिका टीपण्णी सुरु केली आहे. विचारांची लढाई सोडून पंतप्रधान व्यक्तिंची लढाई करु पहात आहेत. साम, दाम, दंड भेदाचा वापर भाजपकडून सुरु आहे. त्यापासून सावध रहावे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम श्री. छ. उदयनराजे यांनी केले. त्यांच्यामागे सर्व कार्यकर्त्यांनी सर्वशक्तिनिशी उभे रहावे, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले. नगरसेवक राजेंद्र यादव यांनी सुत्रसंचालन केले. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, नगरसेवक फारूख पटवेकर, मझहर कागदी, गंगाधर जाधव, दादा शिंगण, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, अप्पा गायकवाड, संग्रामसिंह बर्गे तसेच शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनराजेंच्या कराड येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन
RELATED ARTICLES