Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्याच्या विकासात काडीचाही संबंध नसणार्‍या विद्यमान खासदारांना कायमचे घरी बसवा: नरेंद्र पाटील

जिल्ह्याच्या विकासात काडीचाही संबंध नसणार्‍या विद्यमान खासदारांना कायमचे घरी बसवा: नरेंद्र पाटील

वाई : लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी तत्पर असावा लागतो. त्याचा थेट जनतेशी संपर्कही असावा लागतो. केवळ कॉलर उडवून विकासकामे होत नाहीत. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दहा वर्षात केवळ 14 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विधानपरिषदेचा सदस्य म्हणून मी सातारा जिल्ह्यात जवळपास 13 कोटींची कामे केली आहेत. वाई तालुक्यात प्रचाराच्या अनुषंगाने फिरत असताना सातारचे खासदार कोण.? हे आम्हाला माहीतच नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेमधून ऐकायला मिळत असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असून भगवा झेंडा फडकणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वाई तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार व गाठीभेटीचा कार्यक्रम संपवून वाई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य- महेश शिंदे, आरपीआयचेजिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख-अजित जाधव, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष-काशिनाथ शेलार तालुका प्रमुख- अनिल शेंडे,यशवंत घाडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष-सचिन घाटगे, नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाशफरांदे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकसभा उमेदवार-पाटील म्हणाले,सेना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील मतभेद केव्हाच संपले असूनसंपूर्ण देशात मोदींची लाट आहे, मा. उद्धवजी ठाकरे यांनी देशात व राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजपशी युती केली आहे. विधानपरिषदेचा सदस्य व माथाडी नेता ही माझी ओळख, समाजासाठी करत असलेल्या कार्याची पावती आहे. मी निवडणुकीकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. सामाजिक बांधिलकी व उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशामुळेच मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधत असताना पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांविषयी जनतेच्या मनामध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून भोसले यांनी मतदार संघात भरीव निधी 10 वर्षात दिला तर नाहीच शिवाय संपर्कही ठेवला नाही.
जिल्ह्याचा खासदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनता आम्हाला विचारत आहे. मतदारांमध्ये उदयनराजेंविषयी असलेला नाराजीचा सूर पाहता जिल्ह्यात यावेळी परिवर्तन अटळ असून युतीचा उमेदवार म्हणून मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
अशोकराव गायकवाड यांची नाराजी दूर केली का? असा प्रश्न विचारला असता आठवले साहेबांच्या उपस्थिती मध्ये काही दिवसांपूर्वी स्वतंत्र बैठक घेऊन यापूर्वी झालेले गैरसमज व किरकोळ मतभेद मिटवून जिल्ह्यातील आरपीआय एकदिलाने माझे काम करणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केल्याने अशोकबापू स्वतः माझ्या सोबत प्रचारात सामील झाल्याने आता नाराजीचा प्रश्नच संपला आहे. पुरुषोत्तम जाधवही माझ्यासोबत असून ते नाराज असल्याची केवळ अफवा आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या विकासाचे आपले व्हिजन काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगून गटकोट किल्यांची डागडुजी, शेतकरी व महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असून लवकरच यासंदर्भातला अधिकृत जाहीरनामा प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मदनदादांचा प्रचारातील प्रत्यक्ष सहभाग केव्हा? असे विचारल्यानंतर लवकरच त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात मोठा मेळावा घेणार असल्याचे पाटील म्हणाले.
उघडपणे नाराजी व्यक्त करणार्‍या अशोकराव गायकवाड यांना या निवडणुकीत आपली भूमिका काय राहणार असा प्रश्न विचारला असता आपण नाराज आहोत असे उघडपणे बोलून 2014 च्या निवडणुकीत आलेला कटू अनुभव मी कधी विसरू शकत नाही, असे स्पष्ट करत गेली 40 वर्ष मी आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता असून आठवले हेच माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आदेश पाळून मी महायुतीचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही नेहमी भेटत असतो. तरीही मी त्यांच्या विरोधात पक्षाची भूमिका म्हणून यापूर्वी विरोधात लढलो आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेविषयी कोणीही संभ्रम निर्माण करू नये. या निवडणुकीत आरपीआय ची भूमिका महत्वपूर्ण व निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रास्ताविक सेनेचे जेष्ठ नेते व जिल्हा समन्वय समितीचे सदस्य महेश शिंदे यांनी केले.
पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष किरण खामकर, शहरउपाध्यक्ष गणेश जाधव, महिला आघाडीच्या तालुकाअध्यक्षा कोमल गांधी शहराध्यक्षा जाधव, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राकेश फुले. आरपीआय तालुकाअध्यक्ष श्रीकांत निकाळजे, किशोर गांधी, यशवंत लेले, तुळशीदास पिसाळ, आनंदा वाडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular