Tuesday, February 17, 2026
Homeठळक घडामोडी‘मिशीचा पिळच मजबूत, कॉलर उडवण्याची गरज नाही’

‘मिशीचा पिळच मजबूत, कॉलर उडवण्याची गरज नाही’

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र
कराड: नरेंद्र पाटील यांच्या मिशीचा पिळच मजबूत असल्यामुळे त्यांना कॉलर उडवण्यासारखे प्रकार करण्याची गरज नाही. नरेंद्र पाटील शिवछत्रपतींनाच आदर्श मानतात. काहीजण मात्र जणू जेम्स बाँडला आदर्श मानतात म्हणून की काय सगळीकडे 007 करत फिरतात. आता मात्र निवडणुकीनंतर त्यामधील 7 निघून केवळ 00 च बाकी राहणार आहे. लोकप्रतिनिधीने गंमतीजंमती न करता आपली जनतेविषयी कर्तव्ये पार पाडायची असतात. गाणी म्हणणारे लोक भाड्यानेही मिळू शकतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
कराड येथील शिवाजी स्टेडियमवर सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उमेदवार नरेंद्र पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आ. निलम गोर्हे, आ. शंभूराज देसाई, विठ्ठल रुक्मीणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, भाजप कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, पुरुषोत्तम जाधव, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, सातारा जिल्हा हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून याआधीही शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. सातारा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला असेल तरी भविष्यात हे चित्र बदललेले पहायला मिळेल. निवडणुकीच्या रणांगणातून पळ काढणारे काल सातार्‍यात येउन वीरांच्या आठवणी सांगत होते. काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांची अवहेलना केली. पुढे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विश्‍वासघात केला तर वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ामान्यत्वाची जाणीव करुन दिली. अठरापगड जातींच्या आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मावळ्यांना एकत्र करुन स्वराज्याची निर्मिती केली ज्याने दिल्लीचे तख्तही हलवून टाकले. त्याचप्रमाणे नरेंद्र पाटील हे अगदी सर्वसामान्य माथाडी कुटुंबातील उमेदवार शिवसेनेने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दिला आहे. मराठ्यांचा पहिला भव्य मोर्चा अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली काढला होता. परंतु त्या मोर्चाची तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतली नव्हती. अण्णासाहेब पाटील आणि शिवसेना प्रमुखांचे ऋणानूबंध शेवटपर्यंत कायम होते. सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. माथाडींनी केवळ ओझी वाहण्याचेच काम किती दिवस करायचे? हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करणारे युतीवर चोरीचे आरोप आहेत. शेतकर्‍यांबाबत प्रश्‍न सुटल्यानंतर आम्ही उजळ माथ्याने भाजपशी युती केली. शरद पवार आणि काँग्रेसप्रमाणे छुप्या आघाड्या करुन नाही. दिल्लीत नरेंद्र मोदी आणि सातार्‍यात नरेंद्र पाटीलला निवडून आणण्याचे सर्वांनी ठरवून टाका. विरोधी आघाडीमध्ये कोण पंतप्रधान होणार याचा काहीही पत्ता नाही. अगदी ओवेसीसुध्दा पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत. पंतप्रधानपद म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात झालेली विकासकामे ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली आहेत. माझ्या उमेदवारीमुळे विद्यमान खासदारांना कधी नव्हे इतकी पळापळ करावी लागत आहे. तरीही त्यांना कार्यकर्ते आणि मतदारांचा प्रतिसाद मिळत नाही कारण लोकांचा त्यांच्यावरील विश्‍वास आता संपला आहे. शेतकरी, उद्योजक युवकांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांची ते उत्तरे देउ शकत नाहीत. येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यापेक्षा आपल्या बगलबच्चांच्या माध्यमातून ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कराड ते चिपळूण रेल्वेमार्ग त्वरीत सुरु करण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा पाठपुरावा त्यांनी केला नाही. लोकसभेत जनतेचे प्रश्‍न मांडण्यात त्यांचा खालून पहिला नंबर आहे. सर्वसामान्य मतदारांनी आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेलाच मतदान करण्याचा निर्धार केला आहे.
आ. शंभूराज देसाई म्हणाले, कोणत्याही पदाची आशा न करता सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने काँग्रेस-राष्ट्रवादीला आतापर्यंत भरभरुन मते दिली आहेत. तरीही येथील शेतीच्या पाण्यासह मुलभूत सुविधांचे प्रश्‍न जैसे थे आहेत. पश्‍चिम महाराष्ट्राच्या जलसिंचन क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1995 साली सत्तेवर आलेल्या युती सरकारने केली होती. परंतु त्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली अनेक कामे आघाडी सरकारने आपल्या 15 वर्षांच्या कालखंडात अपुरी ठेवली. मोरणा गुरेघर, मराठवाडी, तारळी धरण प्रकल्प लोंबकळत ठेवण्यात आले. नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून माथाडी चळवळीत काम करणार्‍या पाटण तालुक्यातील भुमीपूत्राला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी परिवर्तनाचा निश्‍चय केला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, असुरक्षित सीमा असणार्‍या आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी स्थिर सरकारची आवश्यकता आहे आणि हे स्थिर सरकार केवळ भाजप-शिवसेना युतीच देउ शकते. पाकिस्तानविरुध्द कठोर भुमिका प्रथमच मोदी सरकारच्या माध्यमातून घेतली जात आहे. गेल्या 5 वर्षांत जनसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. काँग्रेस सरकारच्या काळात मात्र नियमितपणे नवनवीन घोटाळे उघडकीस येत होते. दर महिन्याला नवीन योजना आणणारे की दर महिन्याला नवीन घोटाळा करणारे सरकार जनतेला अपेक्षीत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हा काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित घोटाळा आहे. महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला नसता तर राज्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली येउ शकली असती. सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला भरभरुन दिले परंतु राष्ट्रवादीने जिल्ह्याला काहीच दिले नाही. शेतकरी, वारकरी आणि धारकर्‍यांच्याप्रमाणेच आता सातारा जिल्हा लोकसभा निवडणुकीतही भगवाच खांद्यावर घेणार आहे.
यावेळी निलम गोर्हे, पुरुषोत्तम जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस शिवसेना, भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular