साताराः ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणार्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळपासाठी येणार्या ऊसाला कायम किफायतशीर दर देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या गळीत हंगामातही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 2 हजार 815 रुपये प्रती टन याप्रमाणे एफआरपीनुसार ऊसाला दर दिला असून गाळपासाठी आलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे संपुर्ण रक्कम ऊसपुरवठादार शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. या हंगामात एफआरपीनुसार शेतकर्यांना संपुर्ण रक्कम देणारा अजिंक्यतारा साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
गाळपास आलेल्या ऊसाचा रू.515/- प्रति मे.टनाचा हप्ता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडून सोमवार दि.22.4.2019 रोजी बँकेत वर्ग करण्यात येत असून, एफ.आर.पी. प्रमाणे रू.2,815/- प्र.मे.टन या दराने गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने संबंधीत ऊसपुरवठादार शेतकर्यांना केले असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे.
कारखान्याच्या सन 2018-19 मधील गळीत हंगामात 6,36,339 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 7,85,400 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या गळीत हंगामात सरासरी साखर उतारा 12.33 % इतका राहिला आहे. कारखान्याचा हा गळीत हंगाम नेहमीप्रमाणे यंदाही यशस्वीपणे पार पडला असून कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्यक्षमतेने काम केले आहे.
कारखान्याचे योग्य आर्थिक नियोजन व योग्य व्यवस्थापन यामुळे व संचालक मंडळाने केलेले सहकार्य, ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, तोडणी व वाहतूक कंत्राटदार यांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी संपन्न झाला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव दिनकरराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास रामचंद्र शेडगे, संचालक मंडळाचे सर्व संचालक सदस्य, कार्यकारी संचालक संजीव देसाई उपस्थित होते.
एफआरपीप्रमाणे दर देणारा अजिंक्यतारा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना
RELATED ARTICLES