सातारा : चुकीचा उमेदवार निवडून आल्यास मतदान केले असते तर चांगले झाले असे लोकांना वाटते. परंतु, वेळ निघून गेल्यानंतर परत येत नाही. मग पश्चातापाशिवाय काही करता येत नाही. असेच काही पाच वर्षापूर्वी केले आणि पश्चातापाची वेळ आली. आता पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य दिसले पाहिजे. हुकूमशाहीला उधळून देवून लोकशाही प्रस्थापित करावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. यावेळी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी कुटुंबियांसमवेत मतदान केले. यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या.
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जे हाल देशात आहे. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी व चांगले आयुष्य जगावे, यासाठी मतदान केले. ज्या दृष्टीने महात्मा गांधीनी पंचायत राज व्यवस्था उभी केली होती ती दृष्टी आता दिसत नाही. गत पाच वर्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच हुकूमशाही निर्माण झाली आहे. मुळात ही निवडणूक नसून बदलाची प्रक्रिया म्हणून नागरिकांनी याकडे पाहिले पाहिजे. लोकांच्या बदलाच्या मानसिकतेनेच पुन्हा लोकशाही येईल. जे लोक जनतेसाठी काम करतात ही त्यांच्यासाठी अँटी इन्कम्बन्सी महत्वाची ठरत नाही. मी रोज लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असतो. मतदानाबद्दल काय काय संदेश द्याल, असे विचारल्यास खासदार उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत मतदान हे श्रेष्ठ आहे. लोकांनी मतदान केले पाहिजे. तो त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे ते लोकशाहीचे राजे आहेत. लोकप्रतिनिधी इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचे काम मतदार करतात.देशात बदलाचे वारे आहेत का? असे विचारल्यानंतर खा. उदयनराजे म्हणाले, 100 टक्के बदलाचे वारे असून विरोधकांनी जी खोटी आश्वासने दिली त्याला सीमाच राहिलेली नाही. विरोधकांनी जे काही केले ते पाहून त्यांना ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे होता. लोकांना प्रथम स्वप्न दाखवली ती तुम्ही हिसकावून घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर उपासमारीची वेळ आली. हेकेखोरपणामुळे नोटाबंदी व जीएसटी लागू केली.
विरोधकांना हॅटस् ऑफ.. पण यांनी लोकांची मानसिकता एवढी बदलवून टाकली की लोकांना असे वाटू लागले की दररोज मरण्यापेक्षा एकदाच जीव दिलेला बरा, त्यामुळे एवढ्या आत्महत्या झाल्या. लोकशाहीत जी सभागृह आहेत ती पाडून टाका ना. कारण लोकशाहीत तुम्हाला चर्चाच करायची नसेल तर सभागृहाचा उपयोग काय? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
हुकूमशाही उधळून लावून लोकशाही प्रस्थापित करा : उदयनराजे
RELATED ARTICLES