फलटण (अशोक भोसले) : फलटण तालुक्यात मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तसेच या वर्षी उन्हाची तीव्रता वाढल्याने दुष्काळाच्या तीव्र झळा दिसू लागल्या आहेत. फलटण तालुक्यातील मागणी केलेल्या अनेक गावांत टँकर सुरू करण्यात आले असून झिरपवाडी गावांची चारा डेपोची मागणी प्रस्ताव महसूल विभागाच्या दुर्लक्षित कामकाजामुळे प्रलंबित असल्याने चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
फलटण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील झिरपवाडी गावांने प्रशासनाकडे चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत ठरावाने दि 7 मार्च रोजी मागणी अर्ज दाखल करूनही दि 25 मार्च रोजी मंडलाधिकारी यांना पाठवलेला प्रस्ताव अद्याप महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रलंबित आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर अनेक गावांत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावांत 17 टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहेत.
फलटण तालुक्यातील बरड सर्कल मधील नायकबोमवाडी, फलटण सर्कल मधील ठाकुरकी गोळेगाव पुनर्वसन, कुरवळी खुर्द, वाठार निंबाळकर सर्कल मधील मिरगाव गोळेगाव तावडी पिराचीवाडी वाठार निंबाळकर घाडगेवाडी, तरडगाव सर्कल मधील आरडगाव व चव्हाणवाडी, सासवड सर्कल मधील सासवड, सुरवडी सर्कल मधील घाडगेमळा नांदल सुरवडी अशा एकूण 15 गावातील 49 वाड्यातील 21 हजार लोकसंख्येला 17 टॅँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. तालुक्यातील कापडगाव, पिराचीवाडी, ताठवडा, तडवळे, जाधववाडी (फ), कोरेगाव,मानेवाडी या 7 गावातील विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
वास्तविक पाणी टंचाई आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न या कायम दुष्काळी पट्टयातील मोजकी 5/6 गावे सोडली तर जवळपास सर्वच गावात या संपूर्ण दुष्काळी पट्टयात पाणी व चारा टंचाईची तीव्रता अधिक आहे. संबंधीत ग्रामपंचायतींनी ग्रामसभाद्वारे टंचाईची तीव्रता बघता ठराव घेऊन पाण्याचे टँकर्स व जनावरांना चारा डेपो सुरु करण्याचे प्रस्ताव दाखल करण्याबाबत अवगत करण्याची गरज असून ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा महसूल खात्याने योग्य दखल घेऊन या सर्व प्रश्नाकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.
आदर्की ते आंदरुड या कायम दुष्काळी पट्टयात पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला अलिकडे धोम-बलकवडी प्रकल्पाचा आधार लाभला आहे. तथापी अवघ्या 4 टीएमसी क्षमतेचे हे धरण त्यातही आठमाही त्यामुळे या भागातील दुष्काळी परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.
काही प्रमाणात फळबागा व अन्य शेती येथील जुने पाटबंधारे तलाव, ग्रामतलाव, पाझर तलाव यामुळे समाधानकारक स्थितीत असली तरी उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यानंतर हे सारे तलाव आटण्याच्या स्थितीत असतानाच त्यावर अवलंबून असणार्या विहिरीतील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने या भागात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई सुरु झाली आहे. या भागात उपलब्ध पाण्यात शेती समाधानकारक होत नसल्याने पिके सोडून दिली आहेत या भागातील शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दूग्ध व्यवसाय स्विकारला असल्याने पशूधनाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या जनावरांसाठी पुरेसा चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देताना पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्याचबरोबर लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
महसूल विभागाने याची गंभीर दखल घेवून लोकसभा निवडणूकाचा निकाल पार पडेपर्यंत वाट न पाहता लोकांच्या मागणी प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स तातडीने सुरु करुन लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविला पाहिजे तसेच जनावरांसाठी चारा डेपो सुरु करण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळबागांखालील क्षेत्रात झालेली वाढ विचारात घेता या फळबागांसाठी प्रसंगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार असल्याने त्याचाही विचार शासन प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे.
फलटण तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या
RELATED ARTICLES