म्हसवड : माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असून तापमानाचा पारा वाढला असल्याने कुकुडवाड (धनवडेवाडी) येथील विष्णू आप्पा धनवडे (वय 60) या शेतकर्याचा उष्माघाताने बळी घेतल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुकुडवाड परिसरात गत तीन वर्षा पासून पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकर्याना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या गावा अंतर्गत मानेवाडी, धनवडेवाडी, शिवाजीनगर, कारंडेवाडी, या वाड्या असून गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे.
सध्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू केले आहेत.मात्र शासन तहानलेल्या माणदेशी माणसांची तहान भागवण्यात पुर्ण पणे यशस्वी झालेले नाही,लोकांना पिण्याचे पाणीही पुर्ण मिळत नाही. तर बळीराजाच्या मुक्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला असताना चारा छावणीसुरू केली नाही.
अशा बिकट परिस्थितीत धनवडेवाडी येथील ग्रामस्थ दुष्काळी परिस्थितीवर मात कशी करायची या चिंतेत होते.आज 2मे रोजी अनेक शेतकरी कुकुडवाड येथे ग्रामपंचायती मध्ये पिण्याचे पाणी माणसी 20 लिटर मिळत असल्याने हे पाणी पुरत नाही.तहानच अर्धावर भागवावी लागते मग जनावरांच्या पाण्याचे काय?चारा छावणी कधी सुरू होणार आहे. हे विचारण्यासाठी विष्णू धनवडे ही आले होते. चर्चा करून झाल्यानंतर ते पाच किमी अंतरावर असलेल्या धनवडेवाडी येथे घरी सायकलवरून जात असताना तापमानाचा पारा 41अंश सेलशियस वाढल्याने वाटेतच उष्माघाताने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून त्याच्या निधनाने माण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माण तालुक्यात शेतकर्याचा उष्माघाताने बळी
RELATED ARTICLES