सातारा (शरद काटकर)ः हिंदूचे आराध्य दैवत, सर्वांचा तारणहार, विघ्नहर्ता गणरायाच सातार्यात संकटात अडकला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून विसर्जीत केलेल्या मुर्त्या जशाच्या तशा दुर्गधीयुक्त पाण्यात पडल्या आहेत. ही विघ्नहर्त्याची विटंबना असल्याने पालिका प्रशासनावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत. यानिमीत्ताने पावसाळा आला की, घर बांधायच! ही माकडाची कथा सातारा नगर परिषदेच्या कारभाराला तंतोतंत जुळत आहे.गणेशोत्सव तोंडावर आला की, गणेश मुर्ती विसर्जनाचा प्रश्न ऐनवेळी ऐरणीवर आणून स्वत:चे खिसे भरण्याचा उद्योग यावर्षीही केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या चार वर्षापूर्वी शहरातील मंगळवार तळे आणि मोती तळ्यात गणेश मुर्तीचे विसर्जनास बंदी घातली.या तळ्यामध्ये विसर्जन बंद झाल्याने पालिका प्रशासनाने या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. गणेशोत्सव आला कि ऐनवेळी महसूल,पोलीस, आणि नगरपालिकेची यंत्रणा शहरातील प्रतिष्ठीतांची शातंता कमिटीची बैठक आयोजित करून त्यामाध्यमातून शहरातुन सलोखा राखण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. या बैठकीत प्रत्येक वेळी गणेश मुर्ती विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. ऐनवेळी बैठक झाल्याने पालीका प्रशासन कृत्रीमतळ्याचा विषय चर्चेला आणते यानंतर पालिका प्रशासनाला आयता खाबुगिरीचा मार्ग उपलब्ध झाला. ऐनवेळी विसर्जणाचा प्रश्प हातात घेवून लोकांच्या भावनेचा वापर करून अव्वाच्या सव्वा खर्च कृत्रीम तळ्यावर करण्याची नवी शक्कल लढवली जावू लागली. शेतकर्यांना मंजूर होणारी शेततळी अवघ्या सव्वा लाखात होतात. तर तीच तळी निर्मीतीचा खर्च सातारा नगर पालिका सुमारे 50 लाख करते. तळी निर्मीती करण्याची टेंडर देखील अर्थ पूर्ण संबधात गुंतली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. गणेश मुर्ती विसर्जनाचा ख्योळ आणि पालिकेचा झालाय बट्याबोळफअशी विचित्र परिस्थिती पुन्हा ऐनवेळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मागील वर्षी गणेश विसर्जनाचा विषय पालिका प्रशासनाने शांतता कमिटीच्या बैठकीत चर्चेला आणला. विसर्जनाच्या तळ्यांचा मार्ग बंद झाल्याने कल्याणी शाळे समोर, प्रतापसिंह शेती फार्म, हुतात्मा स्मारक, पालिकेचा बालगोपाळांसाठीचा पोहण्याचा तलाव यासह अन्य ठिकाणी कृत्रीम तळ्याची निर्मीती करण्याचा विषय पक्का करण्यात आला. या बैठकीत विसर्जनासाठी प्रत्येक वर्षी होणार्या खर्चापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर विचारमंथन झाले याला पालिका प्रशासनाने देखील मान डोलावली. प्रत्यक्षात मात्र माकडाच्या घर बांधणीच्या गोष्टीसारखा हा विषय पालिकेने जाणीवपूर्वक चर्चेला आणला नाही. सहा महिन्यांपूर्वी गणेशमुर्तीचे विसर्जन ज्या कृत्रीम तळ्यांमध्ये झाले त्यामध्ये आजही जशाच्या तशा गणेश मुर्ती दुर्गधी युक्त तळ्यातील पाण्यात पडलेले अवशेष पाहून मन सुन्न होते या कृत्रीम तळ्यांपेक्षा नगरपालिकेच्या मालकिच्या पोहण्याच्या तलावात विसर्जीत केलेल्या मुर्ती एकमेकावर पडल्या असून मुर्तींचे अवशेष विखुरले गेले आहेत. ज्या विघ्नहर्त्याचे 8 ते 10 दिवस मनोभावे पूजा अर्चा करतो त्याच विघ्न हर्त्यांची पालिका प्रशासन विटंबणा करत आहे. गणरायाचे हे विदारक रूप पाहून सर्व गणेश भक्तांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. वास्तविक पालिका प्रशासनाची जबाबदारी पार पाडत नसल्याने त्यांच्यावरच विटंबनेचा गुन्हा दाखल करावा या मागणीने आता जोर धरला आहे.
गेल्या 4 ते 5 वर्षात कोट्यावधी रूपयांचा चुराडा कृत्रीम तळी निर्मीती आणि ती बुजवण्यासाठी करण्यात आला आहे. नगरपालिकेने कायमस्वरूपी तळ्यांची निर्मीती केल्यास ठेकेदारांचे पुनर्वसन कसे होणार आणि त्यामधुन अर्थिक उलाढाली थांबतील या उद्देशानेच तळ्यांची निर्मीती होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. खासदार,आमदार,उद्योजक, काही सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांना हाताशी धरून पालिकेने लोकवर्गणीतून या तळ्यांची निर्मीती करावी असा प्रस्ताव गत शांतता कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला होता परंतु पालिकेची अनास्थेमुळे हा प्रश्न पुन्हा ऐनवेळी ऐरणीवर येईल असेही बोलले जात आहे.
वास्तविक आत्तापासूनच पालिका प्रशासनाने गणेश मुर्तींबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नसल्याने शाडूच्या मुर्ती करण्याबाबत गणेशोत्सव मंडळाकडे आग्रहाची भूमिका मांडली पाहिजे. मुर्तीच्या उंचीबाबत नियम आणि निकष बदलले पाहिजेत. मुर्तीकार आणि मंडळांच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेवुन मुर्तींचा खर्च अन्य सामाजिक कामासाठी खर्च केल्यास कसा फायदेशीर ठरल्यास याची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहचवली पाहिजे. गणेश मुर्तीच्या रंगामुळे होणारा आरोग्याचा आणि जलचर प्राण्यावरचा परिणाम आम जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे. या गोष्टी वेळीच झाल्यातर आगामी 2 ते 3 वर्षात शाडूच्या गणेशमुर्ती ची प्रतिष्ठापणा केली जाईल. यासाठी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले आ.श्री.छ. शिवेंद्रराजे यांच्यासह नगरपालिकेची भुमीका महत्वपूर्ण ठरणार आहे. पण यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची तितकीच गरज आहे.
विघ्नहर्ता गणराया अद्यापही दुर्गंधीयुक्त पाण्यातच, पालिकेकडून गणरायाची विटंबना
RELATED ARTICLES