सातारा- पवित्र रमजान महिना चालू असून मुस्लीम बांधवांचे रोजे सुरु आहेत. रोजे सोडण्यासाठी मुस्लीम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. या इफ्तार पार्टीत मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधवही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. इफ्तार पार्टीतून हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडत असते. इफ्तार पार्टीमुळे हिंदू- मुस्लीम ऐक्यातला बळकटी मिळत असून अशा कार्यक्रमात सर्व धर्मियांनी सहभागी झाले पाहिजे, असे मत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी व्यक्त केले.
कुडाळ ता. जावली येथील मदीना मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलत होते. यावेळी जावली पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे, कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे, उपसरपंच गणपत कुंभार, जितेंद्र शिंदे, चंद्रसेन शिंदे, मालोजीराव शिंदे, लालासो वंजारी, मुस्लीम समाज अध्यक्ष शाबीरभाई पठाण, अजीजभाई मुजावर, इम्तीयाज मुजावर, समीर आतार, नासिरभाई डांगे, बशीरभाई डांगे, राजू शेख, समीर पठाण यांच्यासह सर्व मुस्लीमबांधव उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: पंगतीला बसून मुस्लीमबांधवांसमवेत इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देवून सामाजिक सलोखा अबाधीत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आज आपला भारत देश 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना जातीभेद, धर्म आणि वर्णभेद मागे पडला आहे. सर्व जातीधर्मातील लोक गुण्या गोविंदाने नांदतानाच सर्व धमातील सण आणि उत्सव एकत्रीतपणे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, सर्व धर्मातील बंधुभाव वाढीसाठी इफ्तार पार्टी हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सर्वधर्मीय कोणताही भेदभाव न ठेवता सहभागी होवून ऐक्य वाढीला महत्व देतात. यामुळेच आपली भारतीय संस्कृती जगात नावाजली जाते, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
इफ्तार पार्टी मुळे हिंदू- मुस्लीम ऐक्याला बळकटी मिळते : आ. शिवेंद्रसिंहराजे
RELATED ARTICLES