Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedआ.पृथ्वीराज चव्हाण यांचा पाणीटंचाई पाहणी दौरा

आ.पृथ्वीराज चव्हाण यांचा पाणीटंचाई पाहणी दौरा

कराड ः मागील महिन्यात 9 मे रोजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदार संघातील पाणी टंचाईग्रस्त गावांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली होती, त्यावेळी त्यांच्यासमवेत तालुक्याचे अधिकारीही उपस्थित होते. या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर कितपत कामे सुरू झाली आहेत टंचाईग्रस्त गावात टँकर सुरु झालेत कि नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने आज कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदार संघातील पाणी टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या . यावेळी त्यांच्यासोबतच कराडचे तहसीलदार अमरदिप वाकडे, तालुक्याचे पाणी पुरवठा अधिकारी श्री आडके, सौ पवार आणि सौ पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच या पाहणी दौर्‍यात काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, विंग गटाचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, युवानेते इंद्रजित चव्हाण आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.
बामनवाडी गावाला सध्या टँकर चालू असून त्याचे पाणी पुरत नसल्याचे लोकांनी बाबांच्या निदर्शनास आणून दिल्यावर बाबांनी सोबत असलेल्या तहसीलदारांना सूचना करून पाऊस पडत नाही तो पर्यंत एक टँकर वाढवून देण्यास सांगितले. आता बामनवाडी आणि पवारवाडीला दिवसाला चार टँकर पाणी देण्यात येणार आहे. टंचाई सोबत वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यासाठी परवानगी, बामनवाडी येथील लक्ष्मीमंदिराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी संरक्षण भिंत, पवारवाडीसाठी व्यायामाचे साहित्य ही प्रस्तावित कामे मार्गी लावणार असल्याचे बाबांनी सांगितले. वानरवाडी तलावाला 8 कोटी रुपये इतका भरघोस निधी बाबांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकला. त्यातून तलाव खोलीकरण तसेच बंधार्‍याच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम होणार आहे. वानरवाडी बंधार्‍यांची पाणी साठवण क्षमता वाढल्याने तारुख पंचक्रोशीला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून स्थानिक असलेल्या सर्व पक्षांच्या आणि गटा तटाच्या लोकांच्यात समाधान आहे.
प्रश्न समजून लगेच त्यावर तोडगा काढणारा नेता म्हणून बाबांची ओळख आहे त्याचा प्रत्यय तारुख बामणवाडी परिसरातील उपस्थित नागरिकांना आला.
भुरभुशी या गावाला एक दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. विहिरीचा गाळ काढणे व खोलीकरण करणे हि कामे सुरु आहेत. भुरभुशी अंतर्गत मुठ्ठलवाडी येथे 2 जून 2019 पासून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. भुरभुशी गावात एका ग्रामस्थाने स्वतःची बोअर गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे या गावकर्‍याचे आमदार पृथ्वीराज बाबांनी अभिनंदन केले व पाणी टंचाई वर मात करण्यासाठी प्रशासन,लोकप्रतिनिधी प्रयत्न करीतच आहेत परंतु त्याच्यासोबत ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घेतला तर या लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात करता येईल अशी भावना यावेळी श्री चव्हाण यांनी व्यक्त केली.
साळशिरंबे या गावात सद्यस्थितीत दिवसातून एकदा गावास पाणी पुरवठा केला जातो. याच गावात गुलाबराव मोहिते यांच्या खाजगी विंधन विहिरीतील पाणी पुरवठा विहिरीमध्ये सोडून पाणी पुरवठा केला जातो, विहिरीस आडवे बोअर घेण्याचे काम सुरु आहे.तसेच मनव या गावाला 24 हजार लिटर टँकरच्या तीन खेपा केल्या जातात,या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम सुरु करण्यात आले आहे. या वॉटर एटीएम सेंटरला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन गावकर्‍यांचे या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक केले आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular