सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांत असलेल्या मतभेदाचे पडसाद अनेकदा उमटले आहेत. जावली तालुका ही तर मतभेदाची कार्यशाळा ठरलेली आहे. त्यामुळे सोनगाव, ता. जावली या 1700 मतदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करुन सोनगाव परिवर्तन पॅनेलने बाजी मारलेली आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेल प्रमुखांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही सोनगावातील हे सत्तांतर अनेकांच्या जिव्हारी लागलेले आहे.
जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात सोनगाव राजकीयदृष्ट्या एका विचाराने वागणारे गाव आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक महत्त्वाची पदे या गावातील भूमिपूत्रांना मिळालेली आहेत. सध्या राजकारणातील होणारे बदल आणि महत्त्वकांक्षा यामुळे राजकीय विचारसरणीला फाटा देवून राष्ट्रवादी, भाजप, सेना अशीसुद्धा महाआघाडी पहावयास मिळाली. तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी मार्मिक व मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करुन प्रभावीपणे मांडले. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे प्रमुख युवानेते मयुर देशमुख व त्यांचे सहकारी यांची ही खेळी यशस्वी ठरलेली आहे. आ. शशिकांत शिंदे व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर निष्ठा असणार्या पॅनेलला मतदारांनी या निवडणुकीत पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज दुपारी निवडणूक निकाल बाहेर पडताच रस्त्यावर गुलालाची उधळण करीत जयघोषाचा नारा देण्यात आला. आरोप-प्रत्यारोप यापूर्वीच झाले होते. त्यामध्ये पॅनेल प्रमुखांना टार्गेट करण्यात आले होते. परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदासाठी इतर मागासवर्गीय महिला सौ.शशिकला शिवाजी किर्वे, सचिन मोरे, अमोल रोकडे, रेखा पवार, नीलम शिंदे, योगेश चिकणे, तर ग्रामविकास पॅनेलचे जितेंद्र चिकणे, तेजस्विनी शिंदे, सत्यवती दुदुस्कर, दीपक पवार हे विजयी झालेले आहेत. सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनेलच्या निकृष्ट काम व मनमानी कारभार, एकाधिकारशाही याबाबत सोशल मीडियातून वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच वरिष्ठ मार्गदर्शक गणपत शिंदे, नितीन मोरे, प्रदीप शिंदे, सतीश पवार, नवनाथ चिकणे, संदीप चिकणे हा षटकोन करकटकाने जोडण्याचे काम युवा नेते मयुर देशमुख यांनी पार पाडले. त्यामुळे भविष्यात कुडाळ भागाला एक नवे नेतृत्व मिळाल्याची चर्चा सुरु झालेली आहे. सध्या दोन्हीही आमदार मुंबईतील विधीमंडळातील अधिवेशन कामकाजामध्ये व्यस्त आहेत. ते आल्यानंतर भव्य सत्कार सोहळा व नवीन विकासकामांचे भूमिपूजन असा डबलबार उडविणार असल्याचे मनोगत अनेक समर्थकांनी व्यक्त केले आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन सोनगावात परिवर्तन पॅनेलची बाजी
RELATED ARTICLES