पाटण:- जाणीवपूर्वक कामात चुकारपणा केल्या प्रकरणी, शासकीय कामात सचोटी न बाळगल्या प्रकरणी तसेच बैठकांना गैरहजर राहणे आदी कारणांचा ठपका ठेवून पाटण तालुक्यातील १९ तलाठ्यांच्यावर एक दिवसाची बिनपगारी कारवाई करण्याचा आदेश पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिले असताना हि कारवाई मंगळवार दि. २ जुलै पर्यंत मागे न घेतल्यास पाटण तालुका तलाठी संघटनां बेमुद्दत आंदोलन करणार असल्याचा ईशारा पाटण तालुका तलाठी संघटनेने प्रांताधिकारी आणि तहसीलदार पाटण यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने मात्र सातारा जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान किसान योजना, प्रलंबित फेर फार निर्गती, सातबाराचे डीएसपी करणे यांसारख्या महत्वपूर्ण योजनांच्या कामांत वारंवार सूचना देऊनही तालुक्यातील काही तलाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शिवाय या विषयासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीला जाणीवपूर्वक विनापरवाना गैरहजर राहून शासकीय कामांत टाळाटाळ करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून पाटण तालुक्यातील तब्बल १९ तलाठ्यांची एक दिवसाची बिनपगारी कारवाई करण्याचे आदेश पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी बुधवारी जारी केले होते.
हि कारवाई तलाठी डी. पी. डोंगरे, एस. एच. काशिद, ए. डी. भुरकाडे, एन. एम. जाधव, पी. पी. होळकर, व्ही. ए. कांबळे, डी. जे. कोडापे, श्रीमती एस. बी. कांबळे, श्रीमती एस. एस. पाटील, आर. एच. देशमुख, एम. पी. घोरपडे, के. एम. कोळी, पी. व्ही. साबळे, एस. आर. शेटे, डी. एम. भोसले, बी. आर. पाटील, अमोल चव्हाण, के. डी. मुळे, व्ही. वाय. पोळ अशा एकूण १९ तलाठ्यांचा समावेश आहे. अशी तलाठ्यांच्यावर एकत्रित कारवाई होण्याची हि पहिलीच वेळी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मात्र तहसीलदार रामहरी भोसले यांनी केलेली कारवाई चुकीची व नियमाला धरून नसल्याने तसेच पाटण तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी एकत्र येवून तहसिलदारांनी हि कारवाई मागे न घेतल्यास मंगळवार पासून काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे प्रांताधिकारी पाटण व तहसीलदार पाटण यांना दिला आहे. या निवेदनात तलाठ्यांनी पुढे म्हटले आहे. तहसीलदार पाटण यांनी दि. २६ रोजी तलाठ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना तलाठ्यांनी न देता त्यांच्यावर एक दिवसाची बिनपगारी आदेश काढून कारवाई केली आहे. वास्तविक तालुक्याची भौगोलिक परिस्थिती दुर्गम असतनाही तलाठी संवर्ग आपल्या आदेशानुसार तत्परतेने कामे करत असतात. त्यामुळे तालुक्यातील सातबारा संख्या जास्त असतानाही कमी तुलनेत असलेल्या तलाठ्यांनी सातबारा संगणकीकरणाचे काम वेळेत पूर्ण केले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तलाठी व मंडलाधिकारी यांनी केलेले काम तहसीलदार यांनी विचारात घेतलेले दिसत नाही.
अशा परिस्थितीत तहसीलदार यांनी केलेली कारवाई आणि आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसल्याने आम्हास ते मान्य नाहीत. त्यामुळे कर्तव्यावर हजर असून देखील केलेली कारवाई सुडबुध्दीने आणि पूर्वगृह दुषित हेतूने केलेली आहे. सदर कारवाई मंडलाधिकारी यांच्याकडून दबावाने तलाठी यांच्याविरोधात रिपोर्ट घेत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच कोयना टास्क फोर्सचे काम पुनर्वसन विभागाचे असतानाही जबरदस्तीने तालुक्यातील तलाठ्यांवर लादले आहे. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देवूनही तहसीलदार यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
यास्तव तालुक्यातील १९ तलाठ्यांवर केलेली नियमबाह्य कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी तलाठी संघटनेची मागणी आहे. याउपर कारवाई मागे न घेतल्यास पाटण तालुका तलाठी संघ मंगळवार दि. २ जुलै पासून नैसर्गिक आपत्ती, पंतप्रधान किसान योजना व निवडणूक ही कामे वगळून इतर सर्व कामांवर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शेवटी निवेदना दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार पाटण, सातारा जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर तलाठी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष जयेश शिरोडे, सरचिटणीस धनंजय भोसले, कार्याध्यक्ष सचिन शेटे यांच्यासह तलाठ्यांच्या सह्या आहेत.
– पाटण तालुक्यातील 19 तलाठ्यांवर केलेली कारवाई ही चुकीची नसून सदर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्यामुळे करण्यात आली आहे. बैठकीसंदर्भात सर्व तलाठ्यांना मंडलाधिकारी यांच्यामार्फत पूर्वसूचना देण्यात आली होती. ही कारवाई जर चुकीची असेल तर त्यांनी उपविभागीय अधिकारी पाटण यांच्याकडे दाद मागणे गरजेचे होते. तलाठ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये. शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय कामांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. स्वत:च्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. यापुढेही तलाठ्यांकडून अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
रामहरी भोसले
तहसीलदार, पाटण.