फलटण (अशोक भोसले) :
चला पंढरिसी जाऊ्।
रखमादेवीवरा पाहू॥
डोळे निवतील कान।
माना तेथे समाधान॥
अशी अभंगवाणी आळवित मजल-दरमजल करीत आषाढी वारीतील एक एक टप्पा पार करीत विठ्ठलभेटीच्या आशेने पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा आज फलटण मुक्काम आटोपून बरडकडे प्रस्थानित झाला या वेळी प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनागरीतून हा सोहळा पुढे सरकत असताना अनेकांणी आपल्या लाडक्या माऊलींना भक्तीमय वातावरनात निरोप दिला.
माऊलींचा पालखी सोहळा लोणंद पालखी तळावर आल्यानंतर चोपदार यांनी दिंडी प्रमुखांची बैठक शितोळे सरकार यांच्या पालावर समाज आरतीनंतर होईल असे जाहीर केले होते परंतु काही कारणास्तव बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, बैठक फलटण येथे होणार असल्याचे सांगण्यात आले होते या प्रमाणे ही बैठक फलटण येथे पार पडली या मध्ये पुढील मार्गावरील नियोजन करून सूचना देण्यात आल्या व ही बैठक पार पडली या वेळी सर्व चोपदार,दिंडीप्रमुख उपस्थित होते.
या नंतर आज शुक्रवारी दि.5 रोजी सकाळी 6 वाजता विमानतळावरून निघालेल्या या माऊलींच्या सोहळ्याला निरोप देण्यासाठी गिरवी नाका ते डी. एड. चौक येथे नागरिकांनी दुतर्फा रांग करीत दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापुर्वी पालखी तळावर रमेश राजाराम बुरीले, वय 60,रा.नागपूर या वारकर्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे या घटनेची हुरहुर अनेकांना लागुन राहिली ही बाब समजताच त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले,
आळंदीहुन पंढरपूरकडे निघालेला माऊलींचा हा सोहळा काल(गुरुवार) सायंकाळी ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. माऊलींचा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मुक्कामस्थळी विमानतळावर पहाटे पर्यन्त भाविकांची गर्दी होती. माऊलीच्या सेवेत कोणती कमतरता राहु नये म्हणून फलटणकर आपआपल्या परीने प्रयत्नशील व कार्यरत होते. फलटण येथील एक दिवसाचा मुक्काम उरकुन आणि फलटणकरांच्या स्वागताने भारावलेल्या माऊलींच्या सोहळ्याने आज सकाळी 6 च्या सुमारास वरुण राजाच्या वर्षावातच बरड मुक्कामाकडे प्रस्थान केले. तत्पुर्वी पहाट पूजेनंतर माऊलींच्या पादुकांवर राजघराण्यातील सदस्य आणि सातारा जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तुळशी पत्र वाहण्यात आले. फलटणचा मुक्काम संपवून पालखी सोहळा शहरातील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर आला असता निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने माऊलींची पूजा झाली आणि प्रत्येक दिंडीस नारळ, साखर देण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणे ती देण्यात आली. यावेळी राजघरण्यातील सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर आदी माण्यवर उपस्थित होते.
आज (शुक्रवार दि.5)बरड मुक्कामानंतर उद्या(शनिवार दि.6) रोजी हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
लाडक्या माऊलींना भक्तीमय वातावरनात रामनागरीतून निरोप
RELATED ARTICLES