कोरेगांव : निकृष्ट दर्जा, हलगर्जीपणा व ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना सातत्याने बसत असून कोरेगांव-सातारा या राष्ट्रीय मार्गावर सुरु असलेल्या कामाचा प्रश्न गांभिर्याने घ्या अशा सूचना प्रांताधिकारी सौ. किर्ती नलावडे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांसह संबंधीत कामाच्या ठेकेदारांना दिल्या आहेत.
सातारा-कोरेगांव रस्ते कामात झालेल्या त्रुटींवर येथील निनाद फौंडेशनसह कोरेगांव तालुक्यातील नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलन भूमिकेवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी प्रांत कार्यालयात किर्ती नलावडे यांनी बोलावलेल्या सर्व विभागांच्या अधिकार्यांना खडे बोल सूनावत स्पष्ट शब्दात सूचना दिल्या.
सौ. किर्ती नलावडे यावेळी बोलताना म्हणाल्या, सातारा-कोरेगांव मार्गावर सुरु असलेल्या कामाबद्दल नागरिकांमधून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. राष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम एवढ्या ढिसाळ नियोजनात सुरु असल्याने अधिकारी व नागरिकांमध्ये रोष वाढीला लागला आहे. गेल्या तीन महिन्यात तीन बैठका झाल्यातरी संबंधीत विभागाच्या अधिकार्यांमधील बेजबाबदारपणा काही कमी झाला नसल्याचे लोकांच्या तक्रारीतून सिध्द होत आहे. काम गतीने करण्याबरोबरच त्याचा दर्जाही तितकाच महत्वाचा असल्याच्या सूचनाही संबंधीतांना सौ. नलावडे यांनी दिल्या. येत्या 15 दिवसात यात बदल अपेक्षीत असून केलेल्या कार्यवाहीची माहिती तात्काळ द्यावी असे आदेशही त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे श्री. इंगळे यांना दिल्या. ज्या ठिकाणी मातीचे भराव घातलेले आहेत, जेथे मोठे खड्डे खणले आहेत, त्याठिकाणी रात्री दिसतील असे सूचना फलक, मार्गदर्शिका लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोरेगांव शहरातील मुख्य रस्त्यावर असणारी अतिक्रमणे तात्काळ काढण्याच्या सूचना देत सौ. नलावडे म्हणाल्या, एस. टी. थांब्यावर सुरु असलेला खाजगी वाहनांचा राजरोस वावर थांबला पाहिजे, त्यासाठी पोलीस ठाण्याने विशेष दक्षता घ्यावी. लोकांच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता यावी यासाठी पोलीस ठाण्याने कृती कार्यक्रम राबवावा अशा सूचनाही त्यांनी संबंधीत अधिकार्यांना दिल्या. कोरेगांव शहराच्या काही भागात सुरू असलेला दूषीत पाणी पुरवठा तपासून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचार्यांना देवून सौ. नलावडे म्हणाल्या, शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची वेळोवेळी स्वच्छता राखली जावी, शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी स्वच्छता राखली जावी यासाठी कर्मचार्यांना सूचना द्या, मुख्य रस्त्यावरील गटारे अतिवृष्टीपूर्वी स्वच्छ करुन घ्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी नागरिकांच्या वतीने सी.आर. बर्गे, विलासराव बर्गे, भानुदास बर्गे, एस.एस. बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, अजय बर्गे यांनी सूचना मांडल्या. बैठकीस तहसिलदार रोहिणी शिंदे, कोरेगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, रस्ते विकास महामंडळाचे इंगळे, नायब तहसिलदार रसाळ, पोलीस उपनिरीक्षक संतोष साळुंखे, राजेंद्र साबळे, नगरपंचायतीचे स् अशोक बर्गे, व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचार्यांची यावेळी उपस्थिती होती.
कोरेगांव-सातारा रस्त्याचा प्रश्न गांभिर्याने घ्या
RELATED ARTICLES