Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीभाजपचा मंत्रीपद वाटपात राजकीय भ्रष्टाचारः आ.चव्हाण

भाजपचा मंत्रीपद वाटपात राजकीय भ्रष्टाचारः आ.चव्हाण

कराडः काँग्रेसमधून आलेल्यांना थेट मंत्रीपदे देवून भाजपने राजकीय भष्ट्राचार केला आहे. 2003 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी 91 घटनादुरुस्ती केली. त्यामध्ये एखाद्या आमदाराने राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षांतर करता येणार नाही. तो आमदार पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्रीपद देवू शकता. परंतु भाजपने ही घटना मोडून मंत्रीपद दिले.
केवळ पैसा आणि सत्तेच्या दहशतीवर भाजपने कर्नाटक सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करायची आहे. त्यासाठी साम, दाम व दंडाचा वापर होत आहे. हे लक्षात घेवून बहुजन समाजाने आपले स्वहित जाणून वाटचाल करावी. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
गोवारे (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभात ते बोलत होते. आ. बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. आ. आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, सदस्या वैशाली वाघमारे, सरपंच स्नेहल नाटकर, भास्कर देवकर, शिवाजीराव मोहिते, जखिणवाडीचे आदर्श सरपंच अ‍ॅड. नरेंद्र पाटील, नितीन थोरात, युवा नेते प्रतापसिंह पाटील, झाकीर पठाण, सैदापुरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, नानासाहेब जाधव, उदय थोरात, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, प्रतापराव देशमुख, डॉ. शंकरराव पवार, उमेश साळुंखे, शाखा अभियंता आर. जे. पाटील, वैभव थोरात, नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कसल्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न आहेत. सातारमधून उदयनराजे भोसलेंना निवडून दिले पण देशात मात्र वेगळे चित्र दिसले. लोकसभा निवडणूकीत भाजपने सत्ता व पैशाचा पाश्वी वापर केला.
धार्मिक ध्रुवीकरण केले. याही पलिकडे महात्मा गांधींचा खून करणाऱया नथुराम गोडसेला देशभक्त म्हंटले. राष्ट्रपित्यांच्या बाबतचे वक्तव्य करुन सामाजीक ध्रुवीकरणातून ते निवडून आले. मतदान प्रणालीमध्ये दोष आहेत. याबाबतही न्यायालयीन लढाया चालू आहेत. परंतु पुढील निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची आमची आग्रही मागणी आहे. ते म्हणाले, देशातील शेकडो वर्षांची वर्णद्वेष व्यवस्था काँग्रेसने मोडली म्हणून नांगर धरणारा सामान्य माणूस सत्तेत आला. 2014 नंतर या सामाजीक समतेच्या क्रांतीला ब्रेक लागला. ज्यांनी पिळवणूक केली. तीच मंडळी पुन्हा सत्तेत आली आहेत. आणि ते बोलण्यापेक्षा बुध्दीने अधिक काम करत आहेत. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, विकासाच्या वल्गना व भूलथापा देणाऱयांकडे दुर्लक्ष करा. काही भागात विकासाच्या केवळ घोषणा झाल्या. परंतु कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराजबाबांनी घोषणा न करता कामे केली.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबांनी मतदारसंघात प्रत्येक गाव व वाडीवस्तीवर निधी पोहचवला. याची जाणीव जनतेला आहे. मागीलवेळी उत्तरेत उभे राहिले त्यावेळी त्यांच्या पाठीशी असणार्‍या मंडळींना फ्लॅट घ्यायचे होते. आता दक्षिणेत त्यांना उभा करून बंगले घ्यायचे आहेत. त्यांच्या मागे फिरणार्‍यांना कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही, अशी टिका त्यांनी अतुल भोसले यांचे नाव न घेता केली. सुनील काटकर म्हणाले, खा. उदयनराजे भोसले यांना कराड दक्षिणमधून चांगले मतदान मिळाले. या विभागाला उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून निश्चितच झुकते माप दिले जाईल. अजितराव पाटील यांचेही भाषण झाले. संदिप पाटील, संजय देशमुख, कृष्णत देशमुख, शिवाजीराव सावंत यांनी स्वागत केले. निसार मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. संदिप पाटील यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular