Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकचरा रस्त्यावर टाकल्यास नगरपालिका करणार दंडात्मक कारवाई : विद्याताई पोळ

कचरा रस्त्यावर टाकल्यास नगरपालिका करणार दंडात्मक कारवाई : विद्याताई पोळ

शासनाकडून पालिकेला कचरा कर आकारण्याची मिळाली परवानगी:-
वाई : महाराष्ट्र शासनाच्या निर्णया नुसार 1 जुलै 2019 पासून नगरपालिकांना स्वच्छता व आरोग्य उपविधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रतीघरास दरमहा पन्नास रुपये शुल्क पालिकेकडून आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंडया हटविण्यात आल्या असून नागरिकांनी कचरा घंटागाडीमध्येच टाकावा. रस्त्यावर वा इतरत्र कचरा टाकल्यास किंवा जाळल्यास 3 हजार व 5 हजार रुपये दंड होवू शकतो, अशी माहीती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या पुढे म्हणाल्या, 1 जुलै 2019 पासून सदर शुल्क वाढ करण्यात आली असून प्रत्येक घरास प्रत्येक महिन्यास 50 रुपये, दुकाने दवाखान्यांसाठी दरमहा 60 रुपये, शोरुम, ऑटोमोबाईल्स, इलेर्क्टॉनिक्स दुकाने, गोदामे, उपहारगृहे व हॉटेल, पन्नास खाटांपेक्षा कमी असलेले रुग्णालय यांना 120 रुपये, रहाणे व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल 160 रुपये, पन्नास खाटांपेक्षा जास्त संख्या असलेली रुग्णालये, 180 रुपये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये 90 रुपये, विवाह कार्यालये, मनोरंजन सभागृहे, एक पडदा चित्रपटगृहे 1000 रुपये, खरेदी केंद्रे, बहुपडदा चित्रपटगृहे 1500 रुपये तसेच फेरीवाल्यांसाठी 150 रुपये प्रतिमाह कर आकारणी करण्यात येणार आहे. चालूवर्षीची कर वसुली स्वतंत्रपणे करण्यात येणार असून पुढील वर्षीपासून सदर कर घरपट्टीसोबत भरावयाचे आहेत.
घरच्या घरी कचर्याावर प्रक्रिया करून कंपोष्ट खत बनविल्यास वरील कर भरावा लागणार नसून कंपोष्ठ प्रक्रिया करण्यासाठी पालिका सहकार्य करणार आहे.तसेच पालिकेच्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावयाचा असून दोन वेळेस घंटागाडी शहरातील कचरा गोळा करीत आहे. कचरा टाकताना ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावयाचा आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास पहिल्या वेळेस 200 रुपये दंड तर पुढील वेळेस 300 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मोठया प्रमाणावर कचरा टाकणारे हॉटेल, मॉल, उपहारगृहे, विवाह कार्यालये यांनी रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास पहिल्या प्रसंगी 3000 रुपये तर नंतरच्या प्रत्येक प्रसंगी 9 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच कोणीही कचरा जाळल्यास 5000 रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्यावतीने स्वतंत्र पथक तयार करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी कार्यालयीन अधीक्षक- नारायण गोसावी, आरोग्य अधिकारी- गुणवंत खोपडे, यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता कमांडोंची करणार नेमणूक
कचरा व्यवस्थापन, व स्वच्छतेविषयी पालिकेकडून विविध माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे, तरीही काही नागरिक स्वच्छतेचे नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करताना दिसत आहेत. या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पालिकेकडून स्वच्छता कमांडो नेमण्यात येणार आहेत.
– श्रीमती विद्याताई पोळ
मुख्याधिकारी

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular