म्हसवड (विजय भागवत) : राज्यात पावसा अभावी सर्वाधिक चारा छावण्या असलेला तालुका म्हणून माण तालुक्याची ओळख निर्माण झाली असून सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असताना आजही गत सहा महिन्यापासून माण तालुक्यात 106गावांपैकी 82 चारा छावण्यामध्ये सुमारे साठ हजार जनावरं शासनाच्या आशिर्वादाने माणचा बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजा यांचा छावणी वर उपासी तापासी राहून चारा व पाण्याची भुक भागवत असताना माणदेशातील शेतकर्यानी दुष्काळी परिस्थितीत छावणीवरच पोटच्या गोळ्यांप्रमाणे सांभाळेल्या सर्जा-राजा यांचा बेंदुर हा सण भावूक वातावरणात कंठातील हुंदका आवरून साजरा करून वरूणराज्या आमच्यावर कोपू नकोस मुक्या जनावरांची तडफड पाहवत नाही त्यांच्या साठी तरी नभातून बरस अशी आर्त साद माणदेशी बळीराजा घातली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात श्रावण महिन्यात बेंदुर हा सण साजरा केला जातो.आजच्या काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा असला तरीही आजही पुर्व काळापासून शेतीप्रधान देशात शेतकरी व बैल यांचे नातं हे अतुट आहे. शेतकरी वर्ग आजही शेतातील विविध कामं नांगरणी पेरणी व इतर मशागतीची कामे वर्षभर पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळत असलेल्या बैलांकडूनच करत असतात. बैलांवरच शेतकरी वर्गाची मदार असते.बैलांच्या कष्टामुळे शेतकर्याचे जिवन सुखी होत असते याची जाणीव ठेऊन बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बेंदुर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या सणाची शेतकरी हा आतुरतेने वाट पाहत असतो.या सणाच्या निमित्ताने बैलांची व इतर जनावरांची मनोभावे सेवा करण्याची त्यांच्या कडून वर्षभर करून घेतलेल्या कष्टातून उतराई होण्याचा दिवस म्हणून बेंदुर हा सण साजरा केला जातो.या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा -राजा सह इतर जनावरांची दिवसभर सेवा करत असतो.सकाळी सकाळी भल्या पहाटे स्वच्छ पाण्याने अंघोळ घातली जाते.त्यानंतर त्यांना ओळा चारा, गव्हाच्या पिठाचे गोळे,पेंढ या बरोबर पुरण पोळीचा नैवेद्य ही चारला जातो.त्यानंतर बैलांना व इतर गाय म्हैशी या जनावरांना विविध रंगांनी रंगविले जाते, त्यांना बेगीड, गळ्यात नविन कंडा, घुगुरांची माळ,बैलांच्या अंगावर नविन रंगीबेरंगी कापडांची झुळ टाकून गावातून विविध वादूय सनई चौघडे व गजी ढोल यांच्या निनादात मिरवणूक काढून ग्रामदेवतेचं दर्शन घेतले जाते.
मात्र यंदाच्या वर्षी ही नेहमी प्रमाणे माण तालुक्यात बिन पाऊसाचे दुष्काळी ढग गडद पसरले आहेत.पावसाने या वर्षी ही दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू केले आहे.जनावरांसाठी माण तालुक्यात चारा छावण्या सुरू केल्या आहेत. म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनने 1जानेवारी ला राज्यात पहिली चारा छावणी सुरू केली त्यानंतर तालुक्यात शासनाने मार्च महिन्यात चारा छावण्या सुरू केल्या आहेत.आज माण तालुक्यात 106 गावे असलेल्या तालुक्यात 82चारा छावण्या सुरू असून या छावण्या मध्ये लहान मोठी 58262जनावर माळरानात उघड्यावर शासकीय इतमामात चारा पाणी खाऊन जगत असताना पशुपालक शेतकरी हा पशुधन वाचवण्यासाठी सहा महिण्यापासून उपाशी तापासी राहून दुष्काळी परिस्थिती वर मात करत आहे.
अशा भयावह परिस्थितीत माण तालुक्यातील 82चारा छावण्यात बेंदुर हा सण साजरा केला गेला परंतू गावात हा सण साजरा करणे हे भूषण असते मात्र ही वेळ पाऊस न पडल्याने बळीराजा वर सर्जा-राजांचा बेंदुर हा सण साजरा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ही माणच्या शेतकर्यानी हार न मानता आपल्या लाडक्या ढवळ्या पवळ्यांचा सण साजरा केला. या वेळी विविध सामाजिक संघटनांनी शेतकर्याच्या या सणा निमित्त बेंदुर सणा ला लागणारं बैलांचे साहित्य देऊन मदतीचा हात दिल्याने शेतकर्यानी आनंदात बेंदुर हा सण साजरा केला.
राज्यातील सर्वात मोठ्या चारा छावणी मध्ये माणदेशी फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा विजयभाऊ सिन्हा,रेखा कुलकर्णी, रवी विरकर यांनी छावणी मधील शेतकर्यांना छावणीवर बेंदुर सण साजरा करत असल्याची जाणीव होऊ दिली नाही. मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करून शेतकरी व त्यांच्या सर्जा राजा यांना गोडधोड खायल घालून म्हसवड शहरातून मिरवणूक काढून बेंदुर हा सण साजरा केला या वेळी शहरवासियांनी ही बैलांच्या मिरवणूकी समोर फटाक्याची आतषबाजी केली या वेळी छावणी तील शेतकर्यानाही मिष्टान्न भोजन देण्यात आले. या शिवाय माण तालुक्यात इतर छावण्या मध्येही बेंदुर हा सण साजरा करून शेतकर्यानी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बळीराजाला भावनांविवश होऊन बरसण्याचे साकडं घालतं पुढील वर्षी आमच्यावर अशी वेळ येऊ देऊ नकास अशी विनवणी केली आहे
दुष्काळी माण तालुक्यात चारा छावणीवरच बेंदूर सण साजरा
RELATED ARTICLES