पाटण:- महाराष्ट्र सह कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या तिर्थक्षेत्र येराड येडोबा येथे सतत लांबुन येणाऱ्या प्रवासी भाविक भक्तांची गर्दी असते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी येराड येथे सर्व एस.टी. बसचा थांबा करण्याची मागणी पाटण तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी विभाग नियंत्रक सातारा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हणले आहे. तिर्थक्षेत्र येराड येडोबा हे देवस्थान विजापूर – गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तर कराड – चिपळूण या मार्गावर आहे. येडोबा देवस्थानच्या दर्शनाला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र याठिकाणी पाटण, अगाराची लोकल बस सोडली तर बाहेरून येणाऱ्या कोणत्याच अगाराची बस थांबत नाही. यामुळे लांबून येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. येराड येडोबाची यात्रा एप्रिल – मे दरम्यान असते. या यात्रेला लाखो भाविक येत असतात. तर दर महिन्याच्या प्रत्येक पोर्णिमेला येथे हाजारो संख्येने भाविक येतात. येथे येणाऱ्या भाविकांची एस.टी. विना गैरसोय होत असते.
लांबुन येणाऱ्या भाविकांना नाईलाजास्तव पाटण अथवा कोयना येथे उतरून पुन्हा वडापने किंवा लोकल एस.टी.ने येराड येथे यावे लागते. हि येराड येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोयच आहे. तरी कराड – चिपळूण मार्गावर असलेल्या तिर्थक्षेत्र येराड येडोबा येथे सर्व एस.टी. बसचा थांबा करून भाविक भक्तांची गैरसोय थांबवावी आशा मागणीचे निवेदन शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी विभाग नियंत्रक सातारा यांना दिले आहे. यावेळी त्यांच्या सोबत महादेव खैरमोडे, लक्ष्मण कदम, रामचंद्र साळुंखे, संजय शिंदे, अमर जंगम, संकेत नायकवडी यांची उपस्थिती होती.