सातारा (अजित जगताप) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा मध्ये वीस वर्षे पूर्ण सत्ता भोगली आहे. आता या सत्ता केंद्राला भाजप व वंचित आघाडी मुळे राजकीय धक्के बसू लागले आहेत. असे असले तरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ.शशिकांत शिंदे विरोधक पक्ष-गट सवता सुभ्यातच अडखळले असल्याची जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
रणांगण व राजकारणात डावपेच हे महत्वाचे असतात. विरोधकांना कोंडीत पकडून त्यांचा एकजुटीने ताकद लावून पराभूत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे अनेक मातब्बर मंडळींचा पराभव झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणात एकजुटीने अनेकांचा विजय आणि पराभव सुद्धा झाला आहे. याला कोणी ही अपवाद नाही. कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी सामुदायिक निर्णयातून एक सक्षम उमेदवार उभा केल्यास धक्कादायक निकाल लागू शकतो हे सांगण्यासाठी खर्याखुर्या ज्योतिषाची गरज नाही. असे वातावरण कोरेगाव मतदारसंघात काही गटाकडून ऐकण्यास मिळत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाहीत. तरीही दुसर्या बाजूला दांडगा संपर्क, विकास कामांसोबत मॅनेजमेंट कला ही आ. शिंदे यांच्या प्रत्येक विजयात वरचढ ठरली आहे. हे ही तितकेच खरे आहे.याचा अनुभव अनेकांच्या पाठीशी आहे.
कोरगावात राष्ट्रीय काँग्रेस मधून दिवंगत नेते शंकरराव जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉ शालिनीताई पाटील यांच्या नंतर आ. शशिकांत शिंदे यांनी विस्तारलेल्या कोरेगाव मतदारसंघात आपली पक्कड घट ठेवली आहे. याला कारणीभूत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची फळी आहे. तीन आमदारांना निवडून आणण्याची हैट्रिक करणारे काही कार्यकर्ते आज ही राजकारणात सक्रिय सहभाग घेत आहेत.
बाकी कोरेगाव मतदारसंघात तीन टर्म मध्ये वीस वर्षांत अनेक नवीन कार्यकर्ते विविध पक्षात निर्माण झाले आहेत.त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलन सुरू ठेवून लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात सध्या उमेदवारीचा भरणा मोठ्या प्रमाणात होणार हे उघड झाले आहे.
सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील काही गावे मिळून कोरेगाव मतदारसंघ झाला आहे. त्यामुळे भागवारी अटळ आहे. ती नैसर्गिक असली तरी परिवर्तन घडवून आणण्यासाठी ती पुरेशी नाही याची जाणीव जाणकार मंडळींना निश्चितच आहे.काहींच्या बाबतीत पक्ष चांगला आहे पण, उमेदवार निवडून येऊ शकत नाही तर काहींच्या बाबतीत उमेदवार चांगला आहे पण, पक्षाचे धोरण पसंद नाही. अशा प्रकारच्या अडचणीमुळे आता प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसली तरी काहींनी आपल्या हुजरेगिरी करणार्या कार्यकर्त्यांकडून फक्त सोशल मीडियावर उमेदवारी व्हायरल करून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.त्याचा फारसा गांभीर्याने कोणी विचार करीत नाही. हा भाग वेगळा आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी,भाजप-सेने सोबत काँग्रेस,आर पी आय पक्षाची ही ताकद आहे. वंचित आघाडीने अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी वंचित कोणाला आमदारकी की पासून दूर ठेवलं हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे- आ. शशिकांत शिंदे शिवसेना-दत्ताजीराव बर्गे, प्रतापराव जाधव,पुरुषोत्तम माने,रणजितसिंह भोसले भाजप-यशवंत भाऊ भोसले, महेश शिंदे,सोपानराव गवळी-भोसले राष्ट्रीय काँग्रेस-डॉ. सुरेश जाधव ,किशोर बाचल,विजयराव कणसे, किरण बर्गे वंचित आघाडी-चंद्रकांत खंडाईत, सुरेश बोतालजी,डॉ. शालिनीताई पाटील गटातून-अविनाश फाळके शेतकरी संघटना-शंकरराव गोडसे,संजय भगत अशी भली मोठी यादी होऊ शकते. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत असंतुष्ट गटातील कोरगावकरांची स्वाभिमानी मंच नेमके कोणाला पाठींबा देईल? हे सांगणे कठीण आहे. कारण, या स्वाभिमानी मधील काहींनी दिवंगत शंकरराव जगताप यांना विरोध करून डॉ शालिनीताई पाटील यांना निवडून दिले होते. त्यानंतर डॉ. पाटील यांच्याच पडद्याआड आ. शशिकांत शिंदे यांना मदत केली आहे. त्यामुळे नेमका स्वाभिमान हा स्वतःसाठी आहे की कोरेगाव विकासासाठी?असाही प्रश्न युवा पिढीने विचारला आहे.यामध्ये खा. श्री. छ. उदयनराजें यांनाही भूमिका घ्यावीच लागणार आहे. एकूणच कोरेगावातील सवता सुभ्याने फिर एक बार,,, शिंदे सरकार… या घोष वाक्याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.याचा विचार होणार का?हाच खरा प्रश्न जाणकार मंडळींना पडला आहे.
कोरेगावात आ. शिंदे विरोधक सवता सुभ्यातच अडखळल्याची जाणकारांमध्ये खुली चर्चा
RELATED ARTICLES