गावे संपर्कहीन, पुल स्मशानभुमी पाण्याखाली
परळी : परळी ठोसेघर चाळकेवाडी पाटेघर रोहोट परिसरात पावसाचा हाहाकार सुरु असून या परिसरातील जनजिवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांत ओढया नाल्याचे पाणी गेल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. उरमोडीच्या सांडव्यातून चारही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने नदीने पुररेषा ओलांडली आहे.
उरमोडी प्रकल्पातून आज सकाळी दहा वाजता उरमोडीच्या चारही वक्र दरवाज्यातून 10182 तर पावर हाऊस मधून 450 असा एकूण 10632 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उरमोडी प्रकल्पाची पाणी पातळी 93.67 टक्के इतकी झाली असून प्रकल्पात 9.33 टीएमसी पाणी साठा झाला आहे. उरमोडी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने परळी गावानजीक नुकताच बांधलेला उरमोडी पुल पुर्णपणे पाण्याखाली बुडाला आहे. परळी येथील पांडवकालीन महादेव मंदीरात पाणी शिरले आहे. तर स्मशानभुमीही पाण्यात बुडाली आहे. नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे.
गजवडी गावानजीक असलेला गोळेवाडी येथील पुलावरुनही पाणी वाहत आहे. सोनवडी आरे-दरे गावांना जोडणारा पुल दोन दिवसांपासून पाण्याखाली आहे. कारी गावानजीक प्रवेशद्वारा नजीक ओढयाचे पाणी आल्याने रस्त्यावरुनच ओढा वाहत आहे. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
पांगारे धरणापलिकडील गावे संपर्कहीन
पांगारे तसेच पळसावडे धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने सांडव्याच्या पलिकडील बोंडारवाडी, सांडवली, मोरबाग, वारस ही गावे संपर्क हीन झाली आहेत. दोन्ही सांडव्याच्या बाजुचा रस्त्याला पाणी वाहून मोठे भगदाड पडले आहे. सांडवली गावाला तर माळीण सारखी परिस्थती निर्माण झाली आहे. या परिसरात अजुन पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक पुलांना पाणी लागले आहे. असेच पावसाचे प्रमाण राहिल्याने उरमोडी प्रकरल्पातून विसर्ग वाढवण्यात येईल असे कृष्णा सिंचन विभागाच्या वतीने सुचित करण्यात आले आहे.
उरमोडीचे चारही दरवाजे उघडले
RELATED ARTICLES