कराड : सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे झालेल्या दुर्घटनेतील कुटुंबांना श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समितीमार्फत प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत देणार असून, सांगली, कोल्हापूर, सातारा येथील पूरग्रस्त गावांना ही मदत करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पूर परिस्थितीमुळे फार मोठे संकट उभे राहिले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकांचे, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रह्मनाळ (जि.सांगली) येथील दुर्घटनतील मृत्यूमुखी पडलेल्या 12 नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत तर जखमी झालेल्या प्रत्येकाला प्रत्येकी 1 लाख रूपयांची मदत व ज्या गावांत पूरपरिस्थितीमुळे सर्वात जास्त धक्का बसला आहे. अशा पाच गावांच्या पुनर्वसनासाठी 25 लाखांची तरतूद श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात येणार आहे.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, खुबी, कोडोली, कार्वे, दुशेरे या गावांना संरक्षण भिंतीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करून देणार आहे. कराड शहराच्या संरक्षक भिंतीसाठी तात्काळ मंजुरी घेऊन कामास सुरूवात करणार आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत पूरग्रस्त गावातील लोकांना मोफत उपचाराची सोय करून देण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून 893 कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून पूरग्रस्त गावांतील बाधित कुटुंबीयांचा, शेती पिकांचे, फळपिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची सूचना करण्यात आली आहे.
महापूर ओसरल्यानंतर येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ व परिसरात साचलेल्या चिखलाची स्वच्छता करण्याचे काम न. पा. च्यावतीने चालू होते. त्यावेळी पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या अंगावर राजकारणाशी व नगरपालिकेशी काहीहंी संबंध नसलेल्या एखांडे नामक इसमाने चिखल उडविला. यावर विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ना. अतुल भोसले म्हणाले, पूर्वी राजकारणात भाजपाचे दोनच खासदार होते. सध्या भाजपला फार शत्रू आहेत. कोणी नगराध्यक्षांच्या अंगावर चिखल उडविण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यातून कमळच उगवेल. चिखल उडवणारे आपल्या सानिध्यात असतात हे त्यांच्या निदर्शनास आणताच ते म्हणाले, हे तपासून पहावे लागेल.
श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थानमार्फत ब्रह्मनाळ दुर्घटनेतील कुटुंबियांना 2 लाखांची मदत
RELATED ARTICLES