पाटण: सातत्याने विकास कामांचा डांगोरा पिटणार्या आ. शंभूराज देसाई यांच्याच कारकिर्दीत तांबव्याचा पूल व यापूर्वी पाण्याची टाकी ही पडली. आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेला नवीन पुलाचे काम मात्र यांच्या हट्टापायी संबंधित अप्रोच रस्ता पूर्ण न झाल्याने या विभागातील लोकांची दळणवळणाची गैरसोय झाली. आता जुना पूल पडला आणि नवीन पूल तयार असूनही त्याचा योग्य वापर करता येत नाही. त्यामुळे या कृत्रिम आपत्तीला आ. शंभूराज देसाई हेच जबाबदार असून मुख्यमंत्री माझे मित्र आणि पालकमंत्री माझेच ऐकतात असे सांगणार्या आ. देसाई यांचा खोटारडेपणा या निमित्ताने जनतेसमोर आल्याची परखड टीका युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.
तांबवे येथील जुना पूल पडल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी तात्काळ त्या पुलाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. व नव्या पुलाच्या अप्रोच रोडचे काम शासनाने युद्धपातळीवर करून स्थानिकांची गैरसोय दूर करावी अन्यथा याविरुद्ध तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तांबवे येथील परिसरातील ग्रामस्थ निवसराव पाटील(आण्णा), विलासराव पाटील दादा, विश्वासराव निकम, राजाभाऊ काळे, जावेद मुल्ला सरपंच, रवि ताटे, शंकर पाटील, निवासराव शिंदे, वसंत बाबर, भानुदास कदम, प्रल्हाद माने, आबासो पवार, निलेश भोसले, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले की तांबवे येथील जुना पुलाच्या ठिकाणी नवीन पूल व्हावा ही अनेक वर्षांची मागणी होती. आपले नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी याचा गांभीर्याने विचार करून शासन दरबारी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. वेळप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांना थेट पुलावर नेवून स्थानिकांच्या व्यथा मांडल्या. यावर तातडीने निर्णय घेत या नवीन पुलाला आघाडी शासनाने मंजुरी दिली आणि त्यानंतर या कामाला सुरुवात होवून हा नवीन पूल जवळपास तयारही झाला. मात्र सध्या या विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असलेल्या आ. देसाई यांना त्यांच्या पक्षाचे शासन असतानाही या पुलाच्या अप्रोच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही ही खेदाची व दुर्दैवी बाब आहे. केवळ श्रेयाचे व सूडबुद्धीने या विभागावर अन्याय करण्याचे पाप ते करत आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री माझे मित्र आणि पालकमंत्री माझे ऐकतात असा डांगोरा पिटणार्या या आमदारांना त्यांचाच सत्येच्या काळात या पुलाच्या अप्रोच रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही. ढेबेवाडीत जाऊन कोयनेला एवढे कोटी मंजूर केले तर चाफळ ला जाऊन कुंभारगाव च्या कोट्यवधी च्या विकासाच्या गप्पा मारायच्या एवढेच या महशयांचे काम असून आशा घटनांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे पितळ आपोआपच उघड पडत आहे. मात्र त्यांनी काहीही करो या स्थानिक जनतेच्या सुख दुःखात आम्ही कायमचं तुमच्यासोबत आहोत त्यामुळे या नवीन पुलाचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावून स्थानिकांचे दळणवळण सुखकर होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू वेळप्रसंगी वाट्टेल त्या आंदोलनाचीही आमची तयारी आहे.
सन 2009 मध्ये विक्रमसिंह पाटणकर यांना विजयी केल्यानंतर त्यांनी तांबवे सुपणे विभागात किती विकासकामे केली हे जगजाहीर आहेच. त्यानंतर या पुलासाठी थेट आ. अजितदादा पवार यांना तेथे आणले. याशिवाय त्यानंतर पराभव होवूनही आम्ही स्थानिकांच्या सुख दुःखात सामील असतो अगदी परवाच्या पुरात स्थानिकांचे न भूतो न भविष्यते असे नुकसान झाले त्यावेळी ही राष्ट्रवादी चे नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांना तेथे आणून शक्यतो परी मदत मिळवून देण्याचे काम पाटणकर व राष्ट्रवादी ने केले. मात्र पालकमंत्र्यांचा रोडशो, फोटोषेशन करणार्या आ. देसाई यांनी त्यांच्या शासनातील कोणा मान्यवर नेत्याला इकडे आणले का? याचाही विचार करावा. याशिवाय आपण हा नवीन पूल होईपर्यंत जुन्या पुलाच्या दुरुस्ती साठी 60 लाख रु. निधी दिला ते दुरुस्ती चे कामही त्या काळात झाले. मात्र यांच्या कारकिर्दीत या पुलावरील खड्डे भरण्याचे कामही आ. देसाई यांना जमले नाही त्यामुळे या दुर्घटनेस आ. देसाई हेच जबाबदार असल्याचे ही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.
तब्बल 26 वर्षे आमदार असणार्या विक्रमसिंह पाटणकर यांच्या कारकिर्दीत या मतदार संघाचे नंदनवन झाले त्यांना शासन निसर्ग आणि जनताही साथ देत होती. मात्र 2004 साली शंभुराज देसाई हे आमदार झाले त्यानंतर 2005 -06 साली महापूर, अतिवृष्टी महाभयंकर नैसर्गिक संकटे आली. तर स्थानिक जनतेच्या रोजगार व्ययसाय निर्मितीचे प्रकल्पांना विरोध करून त्यांनी कृत्रिम संकट आणले. आता 2014 ला ते परत आमदार झाले त्यानंतर हा 2019 चा हा अभूतपूर्व महापूर कोट्यवधींची हानी होवून स्थानिक उध्वस्त झाले. याच काळात तांबवे येथे पाण्याची टाकी तर आता हा पूल पडला. या शिवाय मग कोयनेचे बोटींग, पर्यटन विकास, विटभट्ट्या बंद करण्याचा यांचा उद्योग त्यामुळे नैसर्गिक व कृत्रिम संकटे हेच आमदार असताना येतात त्यामुळे हे यांच्याच कारकिर्दीत का घडते अशी जनभावना निर्माण झाली असल्याचे मतही सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.
तांबव्याचा पूल पडणे हे आ.देसाई यांचेच पाप: सत्यजितसिंह पाटणकर
RELATED ARTICLES