सातारा: कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरामुळे दोन्ही जिल्हयातील हजारो कुटुंबांचे नुकसान होण्याबरोबरच या जिल्हयातील वाचनालयांमध्ये असलेल्या लाखो पुस्तकांनाही जलसमाधी मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली आणि कोल्हापूरकरांच्या वाचनाची भूक भागवणार्या पुस्तकांची जागा नव्याकोर्या पुस्तकांनी घ्यावी यासाठी मसाप शाहुपुरी शाखेतर्फे वाचनालयांना पुस्तकमदत करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील दानशूरांनी नवी पुस्तके दानरुपाने मसाप, शाहुपुरी शाखेकडे पुढील आठ दिवसात जमा करावीत असे आवाहन शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
दोन जिल्हयात आलेल्या महापुरांमुळे हजारो कुटुंबांचे संसार उध्वदस्त झाले त्याचबरोबर या जिल्हयातील वाचनालयेही उध्वदस्त झाली. त्यातच सांगली येथील नगरवाचनालयाचे यंदाचे शतकमहोत्सवी वर्ष होते. या ग्रंथालयांमधील पुस्तके पाण्यात बुडाल्याने मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने पुस्तकआधार देण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्व असते. अनेक वर्षे दोन्ही जिल्हयातील वाचनाची भूक मागवणार्या पुस्तकांची जागा नव्याकोर्या पुस्तकांनी घ्यावी यासाठी मसाप शाहुपुरी शाखेतर्फे पुस्तकमदत देण्यात येणार आहे. तरी दानशूरांनी नवीन पुस्तके मसाप, शाहुपुरी शाखेकडे जमा करावीत. तसेच ज्यांना पुस्तकांसाठी आर्थिक मदत करायची आहे त्यांनी मसाप, शाहुपुरी शाखा या नावाने चेकव्दारे मदत करावी.
नवीन पुस्तके आणि आर्थिक मदत पुढील आठ दिवसात दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीच्या मुख्य कार्यालयात सकाळी 10 ते 5 यावेळेत आणून द्यावीत असे आवाहनही विनोद कुलकर्णी यांनी केले आहे. नवीन पुस्तके द्यावीत तसेच ती देताना कथा, कांदबरी, ललित लेखन, ऐतिहासिक लेखन, कविता या साहित्यप्रकारातील असावीत. नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक देऊ नयेत असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
‘पूरग्रस्त जिल्हयातील वाचनालयांना दानशूरांनी पुस्तक मदत करावी’
RELATED ARTICLES