सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून, कोल्हापूर,सांगली जिल्हयातील गावांसह सातारा जिल्हयातील जावली,महाबळेश्वर,पाटण तालुक्यातील भुस्खलन झालेल्या गांवांच्या जमिनींचा शास्त्रीय पध्दतीने सखोल परिक्षण करुन आवश्यकते प्रमाणे या गांवांचे पूनर्वसन करावे, कराड विमानतळाच्या विस्तारीकरणात बाधित होणार्या शेतकर्यांना, डॉ.भारत पाटणकर यांचेसह सर्व संबंधीतांशी चर्चा करुन, बाजारभावाप्रमाणे मोबदला प्रदान करावा आणि महापूराच्या तडाख्यात सापडलेल्या वाडया-वस्त्यां-गावांच्या पूर्नउभारणी करता शासनाने नियोजनबध्द कार्यवाही करावी यासह विविध विषयावर सुमारे एक तास विस्तृत चर्चा केली.यावेळी उदयनराजे, आपला शब्द आमच्यासाठी कालही प्रमाण होता, आजही आहे अश्या शब्दात, आपल्या भावना व्यक्त करताना, आपण उपस्थित केलेल्या समस्यांबाबत तातडीने सूचवल्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे मत ना.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करुन,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आश्वस्त केले.
याविषयी अधिक माहीती देताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा तालुक्यातील मौजे भवरगड,मोरेवाडी,बेंडवाडी,जावली व महाबळेश्वर तालुक्यातील घोटेघर,सुलेवाडी, रांजणी, नरफदेव,मेरुलिंग,दानवली,तसेच भिलारचा काही भाग, पाटण तालुक्यातील म्हखंड,जिमनवाडी, बर्गेवाडी,पवारवाडी(डेरवण)विरेवाडी, टोळेवाडी, कजरवाडी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भुस्खलन झाले आहे. कोल्हापूर,सांगली जिल्हयातही भुस्खलन झाले आहे. भुस्खलन झालेल्या ठिकाणी जमिनींना दोन-दोन फुट रुंदीच्या मोठया भेगा पडल्या आहेत, जमिनी खचल्या आहेत.याकामी सायंटिफिक मॅनर्स व्दारे येथील जमिनींचे विश्लेषण झाले पाहीजे, येणार्या दिवसात जर होणारी संभाव्य जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्रसंगी कितीही खर्च आला तरी आवश्यकता असेल तर भुस्खलन झालेल्या गावांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन शासनाकडून केले गेले पाहीजे, काही होणार नाही म्हणून दुर्लक्ष करुन चालणार नाही त्यामुळे शासनाने तातडीने याबाबत पावले उचलावीत अशी आग्रही मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
विमानतळाविषयी चर्चा करताना, ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगतले की, कोल्हापूर, सांगली,कराड येथे आलेल्या महापूरराचे पाणी सुमारे 7-8 दिवस ओसरले नव्हते. कोल्हापूरच्या सुसज्य विमानतळामुळे एनडीआरएफ, आर्मी,एअरफोर्स ची मदत पथके देशाच्या विविध भागातुन हवाई मार्गाने उतरल्यावर, पूरग्रस्त भागात पोहाचली व त्यानंतर मदत कार्याला गती आली. कराडला विमानतळाचे विस्तारीकरण झाले नसल्याने,ज्याप्रमाणात विमाने,हेलीकॉप्टर आदी व्दारे हवाई मदत उतरवणे आवश्यक होते त्या प्रमाणात ती मदत उतरवता आली नाहीत, पर्यायाने सांगली व कराडच्या मदत कार्यात अडथळे आले. भविष्यात अशी समस्या उदभवू नये म्हणून कराड विमानतळ विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणाकरीता, बाधित होणार्या खातेदार शेतकर्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला-नुकसान भरपाई देणेबाबत शासन विचार करीत आहे याबाबतीत, कराड विमानतळ विस्तारीकरण विरोध कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक नेते डॉ.भारत पाटणकर यांचेशी मा.मुख्यमंत्री यांनी बैठकीव्दारे चर्चा करुन, लोकांना विश्वासात घेवून, बाजारभावाप्रमाणे मोबदला देणेबाबत निर्णय घ्यावा मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी यावेळी ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली.
त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, कराड, नाशिक आदी ठिकाणी महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंदाज करु शकत नाही इतके शैक्षणिक, संसारिक,व्यावसायिक,व्यापार-उदिम,पशु-धन,पिक-पाणी आदींचे नुकसान झालेले आहे. साथीच्या रोगांचा फैलाव आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापूरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे, शेतीपूरक व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. याकरीता सुक्ष्म नियोजनव्दारे, शासनाने सढळ मदत देणेबाबत, सक्षमपणे आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करुन, योग्य ते मार्ग अवलंबले पाहीजेत अशी आग्रह मागणी केली.
यावर ना.देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मत व्यक्त करुन, उदयनराजेंनी मांडलेले मुद्ये रास्त आहेत,त्यांच्या सूचनेनुसार योग्य त्या उपाययोजना राबविणेबाबत संबधीतांना आदेश देत असल्याचे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री यांनी तातडीने पृष्ठांकन करुन, संबंधीतांना सूचना निर्गमित केल्या.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेसमवेत, विनित कुबेर, जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, नगरसेवक अॅड.डि.जी.बनकर, काका धुमाळ,युवा नेते संग्राम बर्गे,आदी उपस्थित होते.
भुस्खलन झालेल्या गांवांच्या जमिनींचे सखोल परिक्षण करुन पुनर्वसन करावे
RELATED ARTICLES