इंग्रजी माध्यमातील मुलं जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत
– संजीव नाईक-निंबाळकर
सातारा : जिल्हा परिषदेंच्या सर्व शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर असून या शाळांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्यामुळे आज इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी जिल्हा परिषदेंच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत हे सकारात्मक चित्र असून या पुढील काळातही शिक्षकांनी आणखीन चांगले काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर यांनी आज केले.
आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार, स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जिल्हा परिषद स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा पारितोषिक वितरण आज स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पार पडला, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर बोलत होते. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण, क्रीडा व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धाशाळा समिती सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर आदी यावेळी उपस्थित होते
शिक्षकांमुळे शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद इतर जिल्ह्यांपेक्षा खूप पुढे आहे. प्राथमिक शिक्षण हा मुलांचा पाया असतो यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळेंमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते. जिल्हा परिषदेंच्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत असल्याने पटसंख्या वाढत आहे. ज्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्या कामाची पद्धत इतर शिक्षकांनी अवलंबवावी, मुले शिकली तर जिल्ह्याचा, राज्याचा तसेच देशाचा विकास होईल असे सांगून श्री. नाईक निंबाळकर यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक हा दुसरा पालक असतो. आजही समाजामध्ये शिक्षकांचा आदर राखला जातो. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची पोचपावती दिली जाते. भावी पिढी घडविण्याचे काम तुमच्या हातात असून यापुढेही प्राथमिक शिक्षक अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षकांनी शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाची जोड द्यावी. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिजीटल क्लीप तयार केल्या आहे, त्या इतर विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात येणार्या युट्युब चॅनेलवर टाकल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणीक विकास होईल. जिल्ह्यातील जिल्हा परिषदे शाळा 100 टक्के डिजीटल होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षकांनी शिक्षणातील नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन मुलांना शिक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण सभापती राजेश पवार यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हा परिषदांच्या शाळांचे सकारात्मक चित्र
RELATED ARTICLES