कराड: देशाचा अर्थिक विकासाचा दर इतर 117 देशांच्या तुलनेत 102 क्रमांकावर खाली आला आहे. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकर्यांच्या आत्महत्या या गोष्टींनी उच्चांक केला असताना भाजपला याचे कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. ते काश्मिरमधील 370 कलम हटविल्याच्या आनंदात आहेत.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यामध्ये ते रमले आहेत. त्यांना जनतेच्या भूकेपेक्षा स्वतःचे भजनच अधिक आवडीचे झाले आहे. असे प्रतिपादन जेष्ठ सिने अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. सातारा लोकसभा पोटनिवडणूक व कराड दक्षिण विधानसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे आयोजीत केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. रामहरी रुपनवर, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस रजनी पवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडीक, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नगरसेवक शिवाजी पवार, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, मी बिहारीबाबू या नात्याने सांगतो की, पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील हे शानदार, जानदार, दमदार, कर्तबगार, जंगप्रिय व लोकप्रिय असे नेते आहेत. त्यांच्या प्रचाराची ही मलकापूरची सभा नसून, ती त्यांच्या विजयाची सभा साजरी होत आहे. या दोघांना कराड दक्षिण व मलकापूरच्या जनतेने कधीच नापास केलेले नाही. या निवडणूकीत ते एक नंबरने त्यांना पास होतील, याची मला खात्री आहे. सत्ताधाऱयांकडे अमाप पैसा आहे. निवडणूक मशीनच्या माध्यमातून ते जुमला करु शकतात. परंतु महाराष्ट्रातील बदलते वातावरण बघता काँग्रेस आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. महागाई वाढत आहे. दररोज 3 लाख लोकांना बेरोजगार व्हावे लागत आहे. पीएमसी बँकेची अवस्था काय झाली. हेसुध्दा तुम्ही पाहता आहात. देशातील बिकट परिस्थितीबद्दल कुणाच्याही कानाला संवेदना होत नाहीत, याचे वाईट वाटते. महागाई, घसरता विकासाचा दर या विवंचनेत असणाऱया जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्षित केले जात आहे. जनतेला भूक लागली असल्यामुंळे तुमच्या स्वतःच्या भजनाची त्यांना गरज वाटत नाही. अशी परिस्थिती उभी असताना भाजप सरकार प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत आहे. देशात जो काही विकास झाला आहे. तो काँग्रेसमुळे झाला आहे. कराड दक्षिणमधील जनतेने योग्य माणसांना पुढे करावे. पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील हे दोघेजण सिध्दांतांच्या आधारावर लढतात. त्यांच्या पाठिशी रहा. कराड ही जशी यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. तशीच ती पृथ्वीराज चव्हाण यांची भूमी आहे, असेही ते शेवटी म्हणाले. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाची आघाडी आहे. आघाडीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. मलकापूर हे वेगाने वाढणारे शहर आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीत येथील जनतेने जसा काँग्रेसला आशीर्वाद दिला. तोच आशीर्वाद पुन्हा मला द्या. आ. रामहरी रुपनवर म्हणाले, पृथ्वीराज बाबांचे नाव घेवून आम्ही लातूरला मते मागतो. त्यामुळे तुमच्या मतदारसंघाला या कर्तबगार नेत्याच्या रुपाने केवढी मोठी नामी संधी मिळाली आहे. शरद पवार परवा सुशीलकुमार शिंदेंच्या घरी आल्यानंतर म्हणाले की, मी संसदेतील पृथ्वीराज चव्हाण आणि प्रमोद महाजन यांचे भाषण कधीही चुकवले नाही. संसदेतही अभिमानास्पद ठसा उमटवणारया नेत्याच्या पाठिशी तुम्ही ठाम रहा. सौरभ पाटील म्हणाले, विधानसभेच्या समोरच्या उमेदवाराचे प्रत्येक निवडणूकीत चिन्ह व विचार बदलतात. तीच मंडळी पृथ्वीराज बाबांनी केलेल्या विकासकामांवर टिका करतात. एक किलोमीटर रस्ता करणाऱयांना बाबांनी विकास काय केला हे बोलण्याचा अधिकार नाही. डॉ. इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील, जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली. प्रारंभी शत्रुघ्न सिन्हा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मलकापूरमधील नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
‘भाजपला जनतेच्या भूकेपेक्षा स्वतःच्या भजनाची जास्त आवड’
RELATED ARTICLES