
सातारा- पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीत सक्षम तरुण पिढी निर्माण करून त्याचे शिलेदार विकासभिमुख नेतृत्व असणारे शिवेंद्रसिंहराजे असणार आहेत. बाबाराजे यांच्या सातारा- जावली मतदारसंघातील महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात भाजपच्या माध्यमातून असंख्य विकासकामे झाली आहेत. यामुळे युतीचे सरकार येणार हे स्पष्ट आहे. या सभेला शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रेमापोटी विराट जनुसमुदाय उपस्थित असून यामध्ये विशेषतः मुस्लिम समाजाही मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आगामी राज्य सरकारमध्ये सातारा जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रसिंहराजेंच्या हाती देणार, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत केली.
कुडाळ ता.जावली येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे सातारा- जावली मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ना.पाटील बोलत होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी सभापती अमित कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, पंचायत समितीचे सदस्य सौरभ शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, उद्योजक ज्ञानदेव रांजणे, योगेश गोळे, माजी उपसभापती रवी परामणे, नगरसेवक धनंजय जांभळे, सुशील मोझर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून त्यांना वेळोवेळी भरीव मदत सरकारने केली आहे. वर्षाला ३२०० कोटींचा पिक विमा शेतकऱ्यांना देऊन, जलयुक्त शिवारमधून वर्षाला १ लाख ७२ हजार शेततळे बांधलेली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देऊन शेतीच्या मालालाही वेळोवेळी योग्य भाव सरकारने दिला आहे. भाजपाची सत्ता येणारच,हे माहित असताना देखील शरद पवार झोपेचे सोंग घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा येत्या काळात राष्ट्रवादीमुक्त होईल असा दावाही ना. पाटील यांनी केला.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, दादा तुमची साथ व मुख्यमंत्र्यांचा विश्वास हा आमच्या पाठीशी असल्याने येथील महत्त्वकांक्षी प्रकल्प व उर्वरित सर्व विकासकामे ही येत्या काळात पूर्ण करणार आहे. मी बोलत नाही माझे काम बोलते. त्यामुळे या निवडणुकीत जनता साथ देऊन केलेल्या विकासकामांची पोहचपावती देईल. जावलीतील बोंडारवाडी व महू-हातगेघर धरण, तसेच हुमगाव ते बावधन रस्ता हा सत्तेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करावे. या तालुक्याचा आर्थिक आधारस्तंभ असलेला प्रतापगड कारखाना हा पूर्ववत सुरु करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जावलीचा सक्षम विकास करून तालुक्याला एक नवीन चेहरा देणार आहे. सध्याचा राष्ट्रवादीचा उमेदवार संधीसाधूपणाची भूमिका घेत स्वार्थी राजकारण करत आहे. पाच राजकीय पक्ष बदलून लोकांची दिशाभूल करत आहे. त्यांचा पराजय हा निश्चित असून, पुढच्या कालावधीत भाजपाकडे वळण्याचा प्रयत्न केल्यास दादा आपण थारा देऊ नये, असा चिमटाही शिवेंद्रसिंहराजे यांनी काढला. आता कोणी काहीही बोलू दे,या निवडणुकीत माझा आणि उदयनराजेंचा विजय हा निश्चित आहे. आता कोणताही गजर न वाजवता कमळा समोरील बटन दाबून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना साथ देऊन आपले हात व विकास बळकट करा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. .
माजी आ. सपकाळ म्हणाले, पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी या विकासपुरुषाची न भूतो न भविष्यती अशी विराट सभा होऊन जिल्ह्याला एक चांगला मंत्र देऊन गेल्याने लोक उत्साही झाले आहेत. भाजपाने समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत चांगल्या योजना राबवून सर्वसामान्यांना आधार दिला आहे. येथील लोकांची साथ पाहता शिवेंद्रराजेंना राज्यात एक नंबरचे मताधिक्य मिळणार असून,ते पालकमंत्री म्हणून आपल्याला लाभणार आहेत.
यावेळी अमित कदम, एकनाथ रोकडे,एकनाथ ओंबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.दरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ कुडाळ मधून बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत धडाक्यात पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी चौकाचौकात उत्स्फुर्तपणे स्वागत करून जोरदार प्रतिसाद दिला. अॅड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रसेन शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सरपंच वीरेंद्र शिंदे, दत्ताजी थोरात, नगरसेवक विजय काटवटे,पांडुरंग जवळ, विजय मोकाशी, मोहन कासुर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वनाथ धनवडे, मच्छिंद्र सकटे, सागर भिसे, जिल्हा बँक संचालिका सौ,कांचन साळुंखे, सचिन जवळ, नितीन पार्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.