सातारा (शरद काटकर): शिवसेना-भाजप पक्ष नेतृत्वाने एकत्र येवुन पुन्हा राज्याची धुरा सांभाळावी ही जनमाणसातील भावना बळावली आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात भाजप आणि सेनेचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सफाया झाल्याने त्यातून सावरण्यासाठी सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सेनेचे आमदार शभुंराज देसाई यांना मंत्रिमंडळात चांगले स्थान द्यावे या मागणीने जोर धरला आहे. जिल्ह्यात दोन मंत्रीपदे अपेक्षित असल्याने दिपावळी नंतर जोरदार फटाक्याची आतिषबाजी होईल या अपेक्षेवर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या दोघांना राज्यमंत्रीमंडळात संधी मिळाल्यास सेना-भाजपाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल असे राजकिय तज्ञांचे मत आहे.
भाजपहा ब्राम्हण समाजाचा पक्ष ही जनमाणसातील प्रतिमा घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठा कार्ड आणि सातारच्या गादीचा सन्मान या दोन बाबी एकाच वेळी साध्य करण्याचे धोरण पक्ष नेतृत्वाने आखले आहे. सातारा जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत एकही जागा भाजपने जिंकली नव्हती. माझी महसूल मंत्री आणि विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सातारा जिल्ह्याची भाजपची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, माण, फलटण, वाई आणि सातारा या मतदार संघात प्रत्येक आमदारांपुढे पर्याय निर्माण करून ठेवले होते. राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी राजघराण्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने भाजपसाठी पहिला मोहरा टिपला आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याला खिंडार पाडले. त्यानंतर माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीपुढे एक कडवे आव्हान निर्माण करून राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे सावट निर्माण केले.
या निवडणुकीत निश्चितपणे भाजप आणि सेना घवघवीत यश मिळवेल अशी परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान राष्ट्रवादी मधून निवडून आलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीपुढे अडचण निर्माण झाली. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात भाजपाचा किल्ला अधिकच बळकट झाला. लोकसभेच्या या पोटनिवडणुकी सोबतच विधानसभा निवडणूक एकत्रीत झाली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीत रंगत आणली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले. उदयनराजेंचा पराभव झाला परंतु याचवेळी उदयनराजंचे सख्खे चुलत बंधू सातारा जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गड कायम राखला.
गत विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्णपणे भुईसपाट झाली होती त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात कॉग्रेंस आणि राष्ट्रवादीला भाजपचे कडवे आव्हान असेल असे चित्र निर्माण झाले होते. गेल्या पाच वर्षातील आमदारांचा कारभार आणि पूर परिस्थीतीत झालेली ससेहोलपट या दोन कारणांनी मतदारांची नाराजी वाढली. ती मतदारांनी मतातून व्यक्त केली. या निवडणुकीत भाजप- सेना अपयशाचे मानकरी ठरले. पश्चिम महाराष्ट्रात भाजप चांगल्या पद्धतीने या दोन जिल्ह्यात यश मिळविल असे पक्षनेतृत्वाला अपेक्षित होते. मात्र अनपेक्षित यश पदरी पडल्याने पक्षनेतृत्वापुढे पक्ष वाढीसाठी मोठे कडवे आव्हान उभे राहिले आहे.
सांगली,कोल्हापूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाजपने पुन्हा व्युहरचना आखली आहे. आहे सातारा जिल्ह्यातील तरुण, तडफदार व कुशल संघटक सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचे स्थान देऊन या गादीचा मान राखण्या बरोबरच मराठा कार्ड चालवून भाजपा हा ब्राह्मण समाजाचाच मक्तेदारी असलेला पक्ष हा जनमानसातील गैरसमज दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्व प्रयत्न करणार आहे. पहिल्या यादीत आमदार शिवेंद्रराजे यांना स्थान देऊन मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ही जबाबदारी देताना सातारा जिल्ह्या बरोबरच सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात पक्ष वाढ आणि युवक संघटन करून भाजप बळकट करण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गत निवडणुकीत सातारा जिल्ह्यात फक्त पाटण मतदार संघात विद्यमान आ.शंभुराज देसाई यांनी सेनेचे गड अबाधित राखला होता. देसाई यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे. प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. उत्कृष्ठ संसद पट्टू म्हणून त्यांना दोनदा गौरवण्यात आले आहे. सेनेचे ताकत या जिल्ह्यात वाढीस लागली आहे. राष्ट्रवादीचा बुलंद आवाज शशिकांत शिंदे यांना पराभूत करून महेश शिंदे यांनी यश पदरी पाडले आहे. पक्ष सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात शिवसेनेला आलेले अपयश पाहता सेनेला बळकटी आणण्यासाठी शंभुराज देसाई यांना यावेळी पक्ष नेतृत्वाला मंत्रीमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सेना गतवेळी पेक्षा यावेळी ज्यादा मंत्रीपदे पदरात पाडून घेईल त्यामुळेच देसाई यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देसाई यांनी या पूर्वी सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. अनुभव पाठीशी असल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी करण्याचा विचार पक्षीय पातळीवर सुरू आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शंभुराज देसाई या दोघांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यास सातारा जिल्ह्यात दिवाळी नंतरची फटाक्याची आतषबाजी पहायला मिळेल.
भाजप- सेनेने एकत्र येवुन पुन्हा राज्याची धुरा सांभाळावी ; जनमाणसातील भावना ; आ.शिवेंद्रराजे, आ. शंभुराज देसाई यांना मंत्रीमडळात घेण्याच्या मागणीला वाढता जोर
RELATED ARTICLES