सातारा ः जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अगदी ज्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असायची तेथेही ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शासन 65 मिमी. पावसाचे निकष लावण्याऐवजी 33 टक्के नुकसान झाले हे पाहून सरसकट पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमुखाने केली.
सातारा जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व सदस्यांनी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने पाच जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. मात्र, परतीच्या पावसाने संपुर्ण जिल्ह्याला तडाखा दिला आहे. त्यामुळे केवळ पाच तालुक्याचे पंचनामे ग्राह्य न धरता संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. नुकसानीत इमारतींची पडझड, जमिनीची झालेली धूपही समाविष्ट करावी. मनुष्यबळ नसल्याने अनेक ठिकाणी नुकसानीची पंचनामे झालेच नाहीत. त्यामुळे पंचनामे करण्यास मुदतवाढ मिळावी. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 25 हजाराने नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या सर्व सदस्यांनी केल्या.
सुरुवातीलाच पुरवणी विषय पत्रिका ऐनवेळी मिळत असल्याबद्दल जि. प. सदस्य भिमरावकाका पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या पुरवणी पत्रिकेतच कृषी समिती आणि आरोग्य समितीवरील सदस्य निवडीचा विषय असल्याने इतर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे अध्यक्ष संजीवराजे यांनी निवडीचा विषय स्थगित केला. दरम्यान, या निवडी मंगळवारी होणार आहेत.
मंगेश धुमाळ यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणधिकारी (प्राथमिक) ढिसाळ कारभारामुळे आरटीईअंतर्गत आलेला चार कोटींचा निधी येवूनही संबंधित संस्थांना मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेच, शिवाय संबंधित शिक्षण संस्थांनाही याचा फटका बसल्याचे सांगितले. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी जानेवारी 2019 व मार्च 2019 मध्ये टप्प्याटप्प्याने अनुदान आल्याचे सांगितले. तसेच 168 पैकी 49 फाईल पूर्ण असल्याचे सांगितले. यावर गेल्या 11 महिन्यांपासून फाईल शिक्षणाधिकार्यांच्या टेबलवर धुळखात पडून असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून पूर्तता करून एक महिन्यांच्या आत हा विषय संपवणार असल्याचे सांगितले.
धैर्यशील अनपट म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस नाही. याबाबतचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारत आहेत. तसेच अनेक शाळांमध्ये शौचालये मोडकळीस आली आहेत. त्याठिकाणी निधी देण्याची गरज आहे. महिला सदस्यांनीही हा मुद्दा उचलून धरला. यावर डीपीडीसीच्या माध्यमातून त्याठिकणी निधी देण्यासाठी राज्याशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.
कोपर्डे हवेली येथील उपकेंद्र 2010 पासून निर्गमीत केले आहे. मात्र, जागा नसल्याने अर्ध्या गुंठ्यात सुरू आहे. 11 हजार लोकसंख्येच्या गावासाठी ही जागा अपुरी असूनही शासन लक्ष घालत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.
आरोग्य विभाग धारेवर
आरोग्य यंत्रणा गाफिल असल्याबद्दल सर्वच सदस्यांनी आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक संजोग कदम यांना धारेवर धरले. दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस मिळत नाही. त्यासाठीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यावर रुग्ण संख्येचा ताण असल्याचे कदम यांनी सांगताच गुदगे यांनी तुम्ही यासाठी किती दिवस घालवणार आहात, तोपर्यंत एसएससी बोर्ड थांबणार आहे का असा सवाल केला. त्यानंतर डॉ. कदम यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. तसेच डेंग्यू बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला डॉ. संजोग कदम यांनी जिल्ह्यात खाजगी दवाखाने आणि जिल्हा रुग्णालयात मिळून 1041 डेंग्यूचे रुग्ण डिटेक्ट झाले असल्याचे सांगितले.
खटावमध्ये आरोग्य केंेद्राची इमारत उभारूनही अद्याप ग्रामपंचायतीकडे नोंद नाही. इथले गटविकास अधिकारी फक्त गोड बोलतात. त्यांचे कर्मचारी वर्गावर नियंत्रण नसल्याचेही गुदगे यांनी स्पष्ट केले. वाठार स्टेशन येथील अधिकारी रायबोले यांची बदली होवूनही त्यांनी बदली झालेल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा चार्ज घेतला नाही. ते वाठार स्टेशनमध्येच कार्यरत असल्याचे सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर नियमानसार निलंबन कारवाई करता येईल, याबाबत माहिती घेण्याच्या सुचना केल्या. तसेच पाटण तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातही आरोग्य अधिकार्यांची वानवा असून त्याठिकाणी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी ताथवडा आरोग्य केंद्र बांधून सुरू का झाले नाही? ते बांधून किती दिवस झाले, असा सवाल आरोग्य अधिकार्यांनी केला. हा प्रश्न पुन्हा-पुन्हा करूनही आरोग्य विभागास त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. वीजजोडणी करणे बाकी असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संजीवराजे यांनीच त्याठिकाणी आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग नेमणूक करून व त्वरीत विजेची सोय करून त्याठिकाणी दहा दिवसांत आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या सुचना दिल्या.
महिला सदस्यांना बोलू द्या ः जिजामाला निंबाळकर
सभेत अनुकंपाफच्या मुद्यावरून सौ. अर्चना देशमुख बोलायला उठल्या, त्यावेळी इतर सदस्यांनी बोलणे सुरूच ठेवले. त्यांनी काही वेळ प्रतीक्षा केली. यानंतर त्यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर अनुकंपा भरतीबाबत नंतर बोलू, असे संजीवराजे यांनी सांगितले. यानंतर काही वेळाने या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी ताथवडा आरोग्य केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. तत्पूर्वी सौ. नाईक-निंबाळकर यांनी महिलांनाही बोलू द्या, असे आवाहन सर्व सदस्यांना केले. यावर संजीवराजे यांनी महिलांनी बोलायला उभे रहावे व प्रश्न मांडावेत, असे आवाहन केले. यावेळी जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी महिला बोलायला उभा राहिल्यानंतर इतर सदस्यांनी त्यांचे बोलणे पूर्णपर्यंत जरा धीर धरावा, असे आवाहन केले.
पिक विमा हा संपूर्ण वर्षभरासाठी असावा
पिक विमा शेतकरी सरसकट उतरवतात कारण नुकसान झाले तर भरपाई मिळण्याची त्यांना आशा असते. मात्र, गेल्या वर्षी विमा उतरवला असेल तरच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. पिकविम्याची मुदत मार्चअखेर पर्यंत असते. त्यामुळे ही मुदत संपल्यानंतर उन्हाळ्यात अवकाळीने तडाखा दिल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. हा विमा वर्षभरासाठी असावा, अशी मागणी गुदगे यांनी केली.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हा परिषद सदस्यांची एकमुखी मागणी ः सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
RELATED ARTICLES

