Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीफुले, आंबेडकर, गांधी, मार्क्स समन्वय विचारच तारेल:प्रमोद कोपर्डे

फुले, आंबेडकर, गांधी, मार्क्स समन्वय विचारच तारेल:प्रमोद कोपर्डे

सातारा: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी, मार्क्स या महामानवांच्या समन्वयाचा विचारच समाजाला तारेल असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीचा 22 वा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव गाथा मालिकेच्या पटकथा लेखिका शिल्पा कांबळे यांना प्रमोद कोपर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अँड.हौसेराव धुमाळ होते.
प्रमोद कोपर्डे म्हणाले, भीमाबाई पुरस्कार हा स्त्री कर्तृत्वाचा सन्मान आहे. राज्यातील देशातील विविध जातीधर्माच्या महिलांचा गौरव करण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकस्पद व अभिनंदनीय आहे.
महामाता भीमाईचे नाव घेताना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाही यशस्वी होण्यासाठी मानवमुक्ती व समतेच्या प्रस्थापनेसाठी समग्र परिवर्तनाची कास धरण्याची आवश्यकयता आहे. त्यासाठी जाती धर्माच्या संकुचित चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. साहित्य क्षेत्रातही दलित, ग्रामीण महानगरी आंबेडकरवादी, बौद्ध अशा कप्पेबंद वेगवेगळ्या चुली ऐवजी समग्रतेचे भान ठेवण्याची गरज आहे. दलित जाणीवेचे साहित्य ते दलित साहित्य ही व्यापक भूमिका नकोशी झाली आहे. सामाजिक सांस्कृतिक टोकदार चळवळी संपल्या आहेत. सत्ताधारी होण्याच्या आकांक्षेने कार्यकर्त्यांची मतलबासाठी स्वतंत्र बेटे तयार होत आहेत. बिनभिकार समाजाला हे परवडणारे नाही. विचारांच्या मुस्कटदाबीच्या काळात लेखक विचारवंत भाष्यकारांनी चळवळीला दिशा देण्याचे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. बुद्धाकडे जाण्याचे व क्रांती विचाराची ज्योत पेटवण्याचे असिधारा व्रत जपून प्रत्येकाठायी असलेली सुप्त सर्जकता जागी करण्याची आवश्यकता आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना शिल्पा कांबळे म्हणाल्या, अंध्दश्रध्दा, चंगळवाद पसरवणार्‍या मालिकांचा सुळसुळाट झालेला असताना बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वाचा पुरोगामी वारसा घराघरात पोहोचवण्याचे काम स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून होत आहे. हे सर्वच जातीधर्माच्या समाजाला प्रेरणादायी असून त्यास फार मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मालिकांसाठी पटकथा लेखन करण्याचे खूप वर्षांपासूनचे स्वप्न होते. ते या गौरव गाथेच्या मालिकेने साकार झाले आहे. तरुण पिढीला अभ्यास करण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा देण्याची प्रेरणा ही मालिका पाहणार्‍यांना निश्चितपणे मिळेल. फुले आंबेडकरांचे नाव घेणार्‍यांनी स्त्रियांना समानतेची वागणूक व घरातील कामात मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग वाढवला पाहिजे. आपण बेलघेवडे की कृतिशील सुधारक व्हायचे ते ठरवावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी भास्कर फाळके, भन्ते दीपंकर, वाईचे सतीश कुलकर्णी व अनिल वीर यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. प्राचार्य होवाळे यांनी प्रास्ताविक, प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. अ‍ॅडव्होकेट हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, किशोर बेडकिहाळ यांच्यासह मान्यवर अभ्यासक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular