रहिमतपूर: रहिमतपूर पंचक्रोशीच्या सांस्कृतिक विश्वात मान्यता पावलेले रहिमतपूर पंचक्रोशी संमेलन बुधवार दि.18 डिसेंबर ते गुरूवार दि.19 डिसेंबर पर्यंत (ब्रम्हपूरी) रहिमतपूर येथे होत आहे. हे संमेलन न्युरॉन्स क्टिव्हिटी अँड रिसर्च सेंटरच्या संस्थापक,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ.श्रुती पानसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून स्वागताध्यक्षाची धुरा श्री गाडगे महाराज मिशन मुंबई चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील यांच्याकडे आहे.
संमेलनाचे उदघाटन प्राचार्य पुरूषोत्तम शेठ यांच्या हस्ते होणार आहे.संमेलनाचे यंदाचे सहावे वर्ष असून वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात म्हणून हे संमेलन (ब्रम्हपूरी)रहिमतपूर आश्रमशाळेत घेण्यात आले आहे.रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य रसिक परिवार,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर, सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, श्री गाडगे महाराज आश्रमशाळा (ब्रम्हपूरी) रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.यापुर्वीची संमेलने अनुक्रमे डॉ.राजन गवस, डॉ.आ.ह.साळुंखे,डॉ. बाबा आढाव, कवयित्री आश्लेषा महाजन, जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहेत.
संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेल्या डॉ.श्रुती पानसे या जेष्ठ शिक्षणतज्ञ असून त्यांनी मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठातून ब्रेन-बेस्ट लर्निंग या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रातून त्यांच्या मस्ती की पाठशाला, डोक नव्हे खोकं, मंदुशी मैत्री, पालककट्टा, या लेखमाला प्रसिध्द झाल्या आहेत. लर्न महाराष्ट्र या प्रकल्पांतर्गत विविध पुस्तकांचे लेखन केले आहे.मेंदू विकास या विषयावर त्यांची एकोणीस पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.ज्ञानप्रबोधिनी,यशदा,एस. एन.डी.टी.विद्यापीठ याअंतर्गत सेमिनारमध्ये त्यांचे संशोधन प्रबंध प्रसिध्द झाले आहेत.
चिक् चिक् या एक ते आठ वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या मासिकाचे त्यांनी संपादन केले आहे.शिक्षक,पालक,मानसशास्त्र यांसाठी विविध संस्थांमध्ये त्यांनी चर्चासत्रांचे आयोजन केले आहे.शैक्षणिक विषयावरील टीव्ही रेडिओ कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. आज बुधवार दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिडीने संमेलनाची सुरूवात होईल. अंगापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये कर्मवीरांच्या प्रतिमेला अभिवादन करून, ब्रम्हपूरी येथील विठ्ठल मंदिरमार्गे ही ग्रंथदिंडी संमेलन स्थळावर दाखल होणार आहे. पहिल्या सत्रात प्राचार्य पुरूषोत्तम शेठ यांच्या उदघाटन करण्यात येणार आहे.त्यानंतर दुसर्या सत्रात डॉ. पानसे मैत्री स्वत:शी या विषयावर विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद साधणार आहेत.
तिसर्या सत्रात सायंकाळी 5 वाजता वैभव साने (कोरेगाव)आणि माधवराव शेंडे कलादालन रहिमतपूर विद्यार्थी यांचा गाणी मनातली हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर कु.अवनी विक्रम भोसले हिच्या भरतनाट्यम् नृत्याविष्काराने संगीत मैफिलीची सांगता होईल.गुरूवार दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कल्पना चावला केंद्र, कराडचे संचालक डॉ. संजय पुजारी हे वेध आकाशाचा या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत.त्यामध्ये ते विमानाचा शोध ते चांद्रयान प्रतिकृती मॉडेलच्या साहाय्याने प्रतिकृती करून दाखवतील. नंतरच्या सत्रात आशाताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ साहित्य सुगंध अंतर्गत स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट च्या दिपाली अवकाळे आणि त्यांचे सहकारी गंमत उत्सव हा कार्यक्रम सादर करतील. त्यामध्ये कविता, नाटक, गाणी गोष्टी याद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील या सत्राच्या प्रारंभी अमृता सुभाष निर्मित आज्जी हा लघुपट दाखवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता प्रा.दशरथ जाधव सुत्रसंचालनाखाली निमंत्रीत कविंचे कविसंमेलन होईल.
राजेंद्र कणसे( अंगापूर) यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.हे संमेलन अष्टपैलू साहित्त्यिक आचार्य अत्रे यांना त्यांच्या जन्मशताब्दी करण्यात आले आहे. हे संमेलन गाडगे महाराज नगरीमध्ये संपन्न होणार आहे. संमेलन प्रवेशद्वाराचे नामकरण साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार असे करण्यात आले आहे.विचारमंचाला कवयित्री सरोजिनी बाबर यांचे नाव देण्यात आले आहे.ही माहिती मोहसीन शेख यांनी दिली.
आजपासून सांस्कृतिक विश्वात मान्यता पावलेले रहिमतपूर पंचक्रोशी संमेलन
RELATED ARTICLES